हुंडा नको, मामा फक्त पोगरी द्या मला !
By Admin | Updated: May 11, 2014 23:10 IST2014-05-11T23:10:20+5:302014-05-11T23:10:20+5:30
वधूपित्यांची पहिली पसंती सरकारी नोकरीतील मुलांनाच अधिक आहे. त्या खालोलाख खासगी नोकरी आणि व्यवसाय करणार्या तरुणांना पसंती दिली जाते.

हुंडा नको, मामा फक्त पोगरी द्या मला !
भंडारा : वधूपित्यांची पहिली पसंती सरकारी नोकरीतील मुलांनाच अधिक आहे. त्या खालोलाख खासगी नोकरी आणि व्यवसाय करणार्या तरुणांना पसंती दिली जाते. मात्र शेतकरी आणि त्यातही खेड्यातील सुशिक्षित बेरोजगार उपवर तरुणांना मात्र कुणीही भाव देताना दिसत नाही. त्यामुळे या तरुणांवर हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. बिना हुंड्यात लग्न करायला तरुण असला तरी वधू पिता दहादा विचार करताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. प्रत्येक उपवर मुलींचा पिता सुस्वरुप आणि कमावता जावई शोधत आहे. गावागावात लग्नाच्या बोलणीसाठी बैठका सुरु आहे. मानपान, हुंडा आदी शब्द कितीही म्हटले तरी या बैठकीमध्ये चर्चेला येतच आहे. पूर्वी शेतकर्याला मुलगी देणारे पालक आता शेतकर्याच्या घरात मुलगी द्यायला तयार नाही. स्वत:ची चार एकर शेती असलेल्या उपवर मुलाला मुलगी देण्यापेक्षा शासकीय कार्यालयात शिपायाला मुलगी देणे पसंत केले जात आहे. शेतकर्याच्या मुलाला भाव लग्नाच्या बाजारात एकदम घसरला आहे. त्याला कारणही तसेच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकत नाही. त्यातच थोडे शिकलेले तरुण गावात फिरणे पसंत करतील परंतु शेतात पाय ठेवणार नाही. यामुळे शेतकर्यांची स्थिती नाजूक होत आहे. अशा परिस्थितीत वधू पिता आपल्या मुलींसाठी शेतकरी नवरा शोधताना शंभरदा विचार करतो. याउलट शहरात आणि नोकरीवर असलेल्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा तो एका पायावर तयार असतो. नोकरीत असलेया तरुणांना मागेल तेवढी वरदक्षिणा द्यायलाही तयार असतो. शिक्षक, तलाठी, पोलीस, वनरक्षक आदी नोकरीत असलेल्या तरुणांच्या मागे वधूपिते फिरताना दिसून येतात. त्यातच डॉक्टर आणि इंजिनियर असेल तर मग गोष्टच निराळी. पुण्या-मुंबईत नोकरीवर असलेल्या इंजिनियरला मुलगी देणे सध्या ग्रामीण भागातच काय शहरी भागातही प्रतिष्ठेचे मानले जाते. आमचा जावई अमूक कंपनीत इंजिनियर आहे. असे अभिमानाने चार चौघात सांगितले जाते. त्यामुळे इतर पालक उच्चशिक्षित व शहरात नोकरीतील तरुणाला मुलगी द्यायला तयार असतात. तो व्यसनी आहे की निर्व्यसनी याचाही विचार केला जात नाही. मुलगी ही पुण्या-मुंबईत राहायला मिळेल, या विचाराने हुरळून जाते. अशा स्थितीत ग्रामीण भागात बेरोजगारीत राहणारे तरुण वधू पित्याची नकारघंटा ऐकत असतात. (प्रतिनिधी)