मने बदलली.. अन् मतेही..!
By Admin | Updated: May 19, 2014 23:18 IST2014-05-19T23:18:26+5:302014-05-19T23:18:26+5:30
केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या विविध योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही संपुआ सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई,

मने बदलली.. अन् मतेही..!
कार्यकर्त्यांची निवडणूक : आघाडीसाठी धोक्याची घंटा, नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ
भंडारा : केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या विविध योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही संपुआ सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई, भ्रष्टाचाराचा झालेला कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष संघटीत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चोखपणे बजावण्यात आले. आक्रमक प्रचार अन् मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार या दोन मुद्यांवर संपूर्ण देश ढवळून निघाला आणि वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा स्वरूपात ईव्हीएममधून मते बाहेर पडली. ‘रोम वॉज नॉट ब्युल्ट इन अ डे’ या म्हणीप्रमाणे ही सारी किमया एका दिवसात झाली नाही. लोकांची मने हळूहळू बदली व या बदललेल्या मनांवर जात-पात, धर्म, विचारधारा यासोबतच कुठल्याही स्थानिक मुद्यांचा प्रभाव पडला नाही. मते बदलली, मते बनली, मते ठाम राहिली व चमत्कार घडला याला भंडारा लोकसभा मतदारसंघ अपवाद राहिलेला नाही. भंडारा लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपचे नाना पटोले यांनी मिळविलेला लाखांहून अधिक मताधिक्याचा विजय हा केवळ अशा बदललेल्या मनांचा परिणाम आहे. ही मने फक्त नाना पटोलेंसाठी निश्चितच बदलली नाहीत तर मोदींसाठी झालेले हे मन परिवर्तन आहे, हे आता सर्वच मान्य करीत आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांच्यासारखा मातब्बर नेता रिंगणात होता, मोदींच्या विरोधात असलेले मुस्लिम व दलित मतांची मोट बांधून फायदा उचलण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, तो मोदी लाटेपुढे सपेशल फेल ठरला. प्रतिष्ठा पणाला लावूनही ‘घडी’ नीट बसली नाही, कारण लाटच मोठी होती. नानासाठी कुणबी समाजात एकजूट झाली, परंतु मिळालेले मताधिक्य हे केवळ कुणबी एकजुटीचे नाही, हे ही ुनिकालावरुन मान्यच करावे लागेल. या निवडणुकीत ‘मोदी’ लाट होती, हे निकालच सांगतात, मात्र या लाटेमागील कार्यकारणभाव लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकांना आता गृहीत धरता येणार नाही. आज ते तुमच्या सोबत असले तरी ईव्हीएमपर्यंत त्यांचे मते बदलू शकतात, हे विसरता येणार नाही. लोक बोलत नाहीत करून दाखवितात याचे प्रत्यंतर या निमित्ताने समोर आले आहे. निवडणुकीत मोठी हवा निर्माण करण्याचा आव आणलेल्या ‘आप’ला मतदारांनी सपेशल नाकारले आहे. भंडार्यात ‘आप’ मिडीयावर गाजले. परंतु ते ‘सोशल’ झाले नाहीत. लोकांना आता सत्य समजते, उमजते व ते प्रगटही होते, हे निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येणार्या विधानसभेत आता ‘पब्लिक फर्स्ट’ हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे, यात शंका नाही. हा निकाल म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ‘ठेच’ आहे. आता ती लागली. फक्त पुढे शहाणा कोण होतो, यावरच सारे काही अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)