उरलेल्या अन्नातून शमतेय बालकांची भूक
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:07+5:302016-01-02T08:34:07+5:30
‘अन्न हे पूर्णब्रह्म’, असे पौराणिक ग्रंथात अधोरेखित केले आहे. दारावर उपाशीपोटी आलेल्या जीवाला काही तरी द्या, असा मानवधर्म सांगतो.

उरलेल्या अन्नातून शमतेय बालकांची भूक
सेव्ह अॅण्ड स्माईल फाऊंडेशनचा पुढाकार
इंद्रपाल कटकवार भंडारा
‘अन्न हे पूर्णब्रह्म’, असे पौराणिक ग्रंथात अधोरेखित केले आहे. दारावर उपाशीपोटी आलेल्या जीवाला काही तरी द्या, असा मानवधर्म सांगतो. परंतू आजच्या धकाधकीच्या युगात वेळेअभावी अनेक समारंभातून अन्न पदार्थांची नासाडी होते. मात्र या अन्न पदार्थाला पूर्णब्रह्म समजून एका सेवाभावी संस्थेने उरलेल्या अन्न पदार्थाचा उपयोग वसतिगृहातील बालकांचे भूक शमविण्याचा विडा उचलला आहे.
एकीकडे भंडारा जिल्ह्याची जीवनदायीनी वैनगंगा नदी नाग नदीच्या पाण्यामुळे दूषित होत असल्याचे म्हटले जाते. दूसरीकडे अनेक समारंभातून उरलेले अन्न उकिरड्यावर किंवा नदी वा तलावाच्या पाळीवर फेकल्या जाते. अंदाजापेक्षा पाहूणेमंडळी कमी भरल्यामुळे अन्नपदार्थांची नासाडी होते. मात्र ते अन्न वाया जाऊ नये किंवा फेकल्या जाऊ नये, याची तसदी बहुतांशपणे घेतली जात नाही.
मात्र भंडारा शहरातील स्नेहनगर येथील सेव्ह अॅण्ड स्माईल फाऊंडेशनतर्फे याबाबत जनजागरण करण्यात येत आहे. या संस्थेतील संयोजक विनायक कोरे हे अनेक समारंभासह लहान मोठ्या कार्यक्रमांना भेटी देऊन तेथील वाचलेल्या अन्न पदार्थांची माहिती घेतात. तसेच उरलेले अन्न किती जणांना पुरेल याची कल्पना घेवून ते याबाबत वस्तीगृह किंवा अनाथ बालकांचे संगोपन करणाऱ्यांना कळवितात. असाच प्रयोग त्यांनी कित्येक वेळा केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर स्थित मूकबधिर विद्यालयातील तसेच अन्य वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी उरलेले अन्न पूर्णब्रह्म ठरत आहे. समारंभातून मिळालेले चांगले जेवण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलविण्याचे कार्य करीत आहेत.
सेव्ह अॅण्ड स्माईल फाऊंडेशनचा उपक्रम
अन्न पदार्थांची नासाडी संदर्भात सेव्ह अॅण्ड स्माईल फाऊंडेशनने समाजासमोर अनोखा आदर्श स्थापित केला आहे. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देशभक्ती व त्यांना उपयोगीतेत असलेल्या पुस्तकांचे वाटप केले जाते. बंद असलेल्या वाचनालयांना सुरु करण्यासाठी मदत करणे, वृक्ष लागवड करणे आदी उपक्रमही या फाऊंडेशनतर्फे राबविले जातात.