विकतचे पाणी शुद्ध किती?
By Admin | Updated: April 1, 2015 00:39 IST2015-04-01T00:39:12+5:302015-04-01T00:39:12+5:30
वास्तविक पिण्याचे पाणी हा आरोग्याशी निगडित अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करून व्यावसायिकरीत्या विकायचे असेल ...

विकतचे पाणी शुद्ध किती?
भंडारा : वास्तविक पिण्याचे पाणी हा आरोग्याशी निगडित अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करून व्यावसायिकरीत्या विकायचे असेल तर इंडियन स्टँडर्ड ब्युरोच्या निकषानुसार आणि विविध विभागांच्या परवानगी घ्याव्या लागतात. पण कोणत्याही परवानगीशिवाय जिल्ह्यात पाणी विक्री सुरू आहे. शासकीय अधिकारी खोलात जाऊन चौकशी करीत नसल्याने बनावट पाण्याचा ‘बाजार’ वाढला असून विकतचे पाणी खरंच शुद्ध आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अशुद्ध पाण्याची विक्री जोरात
प्लास्टिकची सीलबंद बाटली किंवा प्लास्टिकचा कॅन यातील पाणी म्हणजे शुद्ध पाणी या बऱ्यापैकी रूढ झालेल्या समजुतीचा फायदा घेत नागपुरात बनावट पाणी विकले जात आहे. अधिकृत ब्रँडेड कंपन्यांच्या पाण्याच्या दरापेक्षा हे बनावट पाणी स्वस्त असल्याने त्याचाच वापर वाढतो आहे. विशेषत: सार्वजनिक समारंभातून हेच बनावट पाणी लोकांना पाजले जात आहे. पालिकेचा टँकर टाकीमध्ये ओतायचा व त्याच पाण्यावर थोडी प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध पाणी म्हणून कॅनमधून विकले जात आहे. वास्तविक अशा बनावट पाण्याची विक्री हा लोकांच्या आरोग्याशी घातक खेळ आहे. अवघ्या पाच-दहा पैसे किमतीचे पाणी शुद्ध म्हणून १०-१५ रुपये लिटरने विकण्याची वृत्ती तर त्याहून घातक आहे. त्यामुळे पाण्याच्या या धंद्यात कुठे कुठे पाणी मुरते, हे पाहण्याची गरज आहे.
विना परवाना उत्पादन
रेल्वेस्थानक, हॉटेल किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अवस्था तर खूप वाईट आहे. या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याची काळजी म्हणून शुद्ध केलेले पाणी विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. २० रुपयांची एक बाटली घेतली तर तहान भागतेच. पण अशुद्ध पाण्याची चिंता मिटते. ही भावना त्यामागे असते. बॅ्रण्डेड कंपन्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नक्कीच खबरदारी घेतात किंवा दर तीन महिन्याला त्यांना विविध विभागांच्या तपासण्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे खबरदारी घ्यावीच लागते. परंतु हे झाले परवानगी घेणाऱ्या पाणी उत्पादक कंपन्यांबाबत. शहरात असे काही पाणी उत्पादक आहेत, की त्यांनी विनापरवानाच पाणी उत्पादन सुरू केले आहे आणि त्याची विक्रीही जोरात सुरू आहे. हे पाणी केवळ प्लास्टिक कॅनमध्ये सील केले जाते म्हणून शुद्ध म्हणायचे, अशी परिस्थिती आहे.