पालोर्यात इसमाचा खून
By Admin | Updated: June 7, 2014 23:44 IST2014-06-07T23:44:52+5:302014-06-07T23:44:52+5:30
ज्या कामासाठी पैसे घेतले होते, ते काम केले नाही आणि पैसेही परत का देत नाही, या कारणावरुन झालेल्या भांडणात तिघांनी मिळून एका इसमाचा खून केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ९.३0 वाजताच्या

पालोर्यात इसमाचा खून
पैशासाठी भांडण : मोहाडी पोलिसांनी केली तिघांना अटक
भंडारा : ज्या कामासाठी पैसे घेतले होते, ते काम केले नाही आणि पैसेही परत का देत नाही, या कारणावरुन झालेल्या भांडणात तिघांनी मिळून एका इसमाचा खून केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे घडली.
प्रभू ऊर्फ कारु ईस्तारी आगाशे (५0) रा.पालोरा असे मृताचे नाव असून याप्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कैलाश बांते (३८), ग्रामपंचायत सदस्य वसंत राऊत (४५) आणि अरविंद कळाम (३४) रा.पालोरा अशी आरोपींची नावे आहेत.
अरविंद कळाम याने प्रभू आगाशे याला जंगलातून बांबू आणण्यासाठी ६0 रुपये दिले होते. मात्र प्रभू आगाशे याने ते काम पूर्ण केले नाही आणि घेतलेले पैसेही परत दिले नाही. त्यामुळे शुक्रवारला सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास पालोरा येथील डेकाटे यांच्या पानटपरीत आगाशे आणि कळाम यांच्यात पैशावरून भांडण सुरू झाले. यावेळी कळाम याच्यासोबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कैलाश बांते, ग्रामपंचायत सदस्य वसंत राऊत हे होते. वाद वाढल्यानंतर या तिघांनी प्रभूच्या डोक्यावर जबर मारहाण केली. यात तो रक्तबंबाळ झाला. याही स्थितीत प्रभू हा घरी पोहोचला. घडलेली घटना पत्नीला सांगितली. त्यानंतर हातात रॉड घेऊन तो घराबाहेर गेला. दारु दुकानात जाऊन दारु ढोसली. त्याचवेळी कळाम, बांते व राऊत हेदेखील दारुच्या दुकानात होते. त्यानंतर हे तिघेही प्रभूवर पाळत ठेऊन होते. प्रभू तिथून निघाल्यानंतर खडकी-पालोरा मार्गावर रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या या तिघांनी प्रभूच्या डोक्यावर व पाठीवर काठीने जबर मारहाण केली. यात प्रभू रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर हे तिघेही तिथून पळाले.
खडकी-पालोरा मार्गावर कुणीतरी इसम रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एका इसमाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून प्रभू आगाशे याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृताची पत्नी गीता आगाशे यांच्या तक्रारीवरून रात्रीच या तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुद्ध भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून बयान नोंदविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास मोहाडीचे पोलीस निरीक्षक गुंजवटे, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, करडीचे सहायक फौजदार अश्विन मेहर करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)