दमदार पावसाने शेतकरी सुखावला
By Admin | Updated: July 15, 2014 23:59 IST2014-07-15T23:59:39+5:302014-07-15T23:59:39+5:30
मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले.

दमदार पावसाने शेतकरी सुखावला
उत्पादनात घट होणार : काही ठिकाणी रोवणीला प्रारंभ
भंडारा : मृग नक्षत्रात जोरदार पावसाच्या अपेक्षेने बळीराजाने पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पऱ्हे करपले. काहींनी टँकरच्या पाण्याने तर काहींनी माठाने पाणी देऊन पऱ्हे वाचविले. परंतु काल रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज मंगळवारला, भंडारा येथे २० मि.मी., मोहाडी १४.६ मि.मी., तुमसर ५७.२ मि.मी., पवनी ४९.५ मि.मी., साकाली ५०.० मि.मी., लाखांदूर ६.२ मि.मी., लाखनी ३६.२ मि.मी. असा सरासरी ३३.४ मि.मी. पाऊस बरसला. यावर्षी केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. आजचा सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात तर कमी पाऊस लाखांदूर तालुक्यात झाला.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणीला प्रारंभ केला आहे. परंतु पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी १५ जुलैपर्यंत ४० टक्के रोवणी होण्याची गरज होती. परंतु मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे रोवणी खोळंबली होती. पऱ्हे सडून गेले होते. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. यावर्षी पावसाअभावी पऱ्हे सुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
तुमसरात धो-धो
काल रात्रीपासून तुमसर शहरात धो-धो पाऊस बरसत आहे. आतापर्यंत बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर पऱ्हे वाचविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाचा घटता आलेख
मागीलवर्षीची अतिवृष्टी वगळल्यास त्यापूर्वीच्या चार वर्षाचा पावसाच्या सरासरीचा आलेख बघितल्यास दुष्काळ सदृष्यस्थिती लक्षात येईल. पावसाच्या अंदाजावर शेतकरी अवलंबून असतो. मात्र यावर्षीचा अंदाज चुकला. चौरास भागात विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सिंचन होते.
जलाशयाची स्थिती भीषण
भंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी हा जलसाठा पेरणीसाठी उपयोगी ठरला नाही. प्रकल्पाचे पाणी रोवणीपूर्वी चिखलासाठी आवश्यक असते. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. (लोकमत चमू)