पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी सुखावला
By Admin | Updated: August 5, 2015 00:44 IST2015-08-05T00:44:03+5:302015-08-05T00:44:03+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने यंदा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी सुखावला
भंडारा : मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने यंदा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. पेरलेले बियाणे व धान पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. अशातच रात्रीपासून दमदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ३२.४ मि.ली. पावसाची नोंद करण्यात आली. तुमसर तालुक्यात सर्वाधिक ५९.४ मि.मी. पाऊस झाला. मध्यप्रदेशात पडणाऱ्या पावसामुळे जलस्तर वाढत असल्यामुळे आणि वैनगंगा नदीचा जलस्तर वाढल्यामुळे गोसीखुर्द धरणाचा एक वक्रद्वार ०.२५ मीटरने उघडण्यात आला असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळ्याचे दिवस असतानाही पाऊस गायब झाल्याने बळीराजाचा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडेल ही परिस्थिती निर्माण झाली. जून व जुलै हे पावसाचे दोन महिने काही अंशत: पावसाच्या हजेरीनंतर पूर्णपणे कोरडे गेलेत. पहिल्या पावसानंतर बळीराजाने शेतात धान रोवणीसाठी नर्सरी व अन्य पिकांची पेरणी केली. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशांनी रोवणी आटोपती घेतली. सिंचन व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील धान पीक वाचविली. मात्र, अन्य बळीराजांवर अस्मानी संकट ओढवले.
जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक करपू लागल्याने बळीराजाची परिस्थिती जणू तो ‘कोमात’ गेल्यागत झाली होती. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. वरूणराजाने धरतीकडे पाठ फिरविल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवल्याची परिस्थिती उद्भवणार असल्याचे चिन्ह दिसून लागली. अशात सोमवारला दुपारपासून पावसाने पुनरागमन केले. रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. मागील २४ तासापासून जिल्ह्यात पावसाची हजेरी लागल्याने शेतातील धान पीक व पेरलेली अन्य पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला असह्य उकाळा गारव्यात परिवर्तीत झाला आहे. पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
पवनीत शेतकरी सुखावला
पवनी : तालुक्यात मागील पंधरा दिवस ऊन तापल्याने शेतकरी चिंतातूर झालेले होते परंतू दि. ३ आॅगस्टचे रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने धान व सोयाबिन उत्पादक शेतकरी सुखावला आहे. धानाची खोळंबलेली रोवणी पूर्ववत सुरू झालेली आहेत. तसेच चौरास भागात सिंचनाचे भरवशावर पूर्वीच झालेली रोवणी शेतात पाणी साचल्याने हिरवीगार दिसू लागले आहेत.
तालुक्यात १ जून ते ४ आॅगस्ट पर्यंत पडणारा सरासरी पाऊस ६१६.२ मि.मी. असतो यावर्षी ५७६.७ मि.मी. पाऊस पडल्याने केवळ ९४ टक्के पाऊस झालेला आहे. दि.४ आॅगस्ट रोजी २३ मि.मी. पाऊस झाल्याने रोवणी पूर्ववत सुरू झालेले आहेत. रोवणी एकाच वेळी सुरू झाल्याने रोवणी करणाऱ्या महिला शेतमजूरांना रूपये १५० पर्यंत मजूरी मिळू लागली आहे. मजुरीचे दर वाढल्याने मजूरवर्ग सुखावला आहे.
५० टक्के रोवणी शिल्लक
साकोली : जुनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच पऱ्हे भरले. मात्र नंतर पावसाने दांडी मारल्याने पऱ्हेही भरण्याच्या तयारीत असताना अधामधात पाऊस आला. पऱ्हे जगली तर पाण्याची सोयी सुविधा असणाऱ्यांनी रोवणी आटोपली. मात्र त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाला. मागील पंधरा दिवसापासून पाऊस बेपत्ता होता. त्यामुळे तालुक्यातील जवळपास ५० टक्के रोवणी रखडली होती. दोन दिवसापासून पावसाची पुन्हा रिमझिम सुरू झाली आणि पुन्हा रोवणीला वेग आला. मात्र शेतीच्या हंगामाला यावर्षीही उशीर झाल्याने पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट होणार, अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मजुरीचे दर २०० रूपयावर
लाखनी : तालुक्यात आज सकाळी ८ वाजतापर्यंत २४ मि.मी. पाऊस पडला आहे. आज दिवसभर पावसाची झड सुरू होती. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. धान रोवणीला गती आलेली आहे. तालुक्यात ३ आॅगस्टपर्यंत ५७१ मि.मी. पाऊस पडला आहे. अद्यापही पुरेशा पाऊस न पडल्यामुळे रोवणी खोळंबली होती. आजच्या पावसामुळे रोवणीला वेग आलेला आहे. मजुरीचे दर २०० ते ३०० रूपयावर गेले आहेत. तालुक्यात धान शेतीचे २२६८३ हेक्टर क्षेत्र आहे. यात १९२५ हेक्टर जमिनीवर पऱ्हे लावलेले होते. ४२०५ हेक्टर जमिनीवर भाताची आवत्या पद्धतीने लागवड केली आहे. १७ हजार हेक्टर शेतीवर रोवणी होते. आवश्यक होते. यापैकी ५ हजार हेक्टर शेतीवर रोवणी पुर्ण झाली आहे. तालुक्यात ८६६ हेक्टर जमिनीवर तुर लागवड केली आहे. हळद लागवड १० हेक्टर जमिनीवर, खरीप तिळ १० हेक्टर, भाजीपाल्याची लागवड ५५ हेक्टर, ऊस १२० हेक्टर, मिरची ३ हेक्टर, केळी २ हेक्टर याप्रमाणे लागवड करण्यात आली आहे. लाखनी तालुक्यात मोटारपंपाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी आटोपली आहे. रोवणी सुकण्याची वेळ आली असतानी पाऊस पडल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे. ओढे, बोड्या, तलाव अजुनही पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. विहीरीच्या पाण्याची पातळी वाढलेली नाही.
तुमसरात पिकांना संजीवनी
तुमसर : तालुक्यात ४७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाण्यामुळे धान तथा इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार केवळ ४० टक्के क्षेत्रात रोवणी झाली आहे. ही रोवणी ११ हजार २४ हेक्टरमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच तुर पिकाची लागवड ११८४ हेक्टर, ऊस ९७५ हेक्टर, तीळ २५ हेक्टर, भाजीपाल्यांची लागवड २२६ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. एकूण पेरणीचे क्षेत्र १३ हजार ५९५ हेक्टर इतकी आहे. तालुक्यात भातपिकाचे विक्रीम उत्पादन होते. येथे पाऊस पडण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. मात्र सिंचनाच्या सोयीत मात्र हा तालुका पिछाडीवर आहे. पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी शेतकरी असमाधानी दिसत आहे. तालुक्यात पावसाने शंभर टक्के सरासरी गाठली नसल्याने तलावही कोरडे आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
धरणातील जलसाठ्यात वाढ
सोमवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने गोसीखुर्द धरणाचा एक वक्रद्वार ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहे. यातून ४९.०० क्युमिक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने धरणातील जलसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे रात्रभर पाऊस पडल्यास बुधवारी धरणाची आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.
तुमसरात ५९.४ मि.मी.पाऊस
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ३२.४ मि.ली. पावसाची नोंद करण्यात आली. तुमसर तालुक्यात सर्वाधिक ५९.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल मोहाडी तालुक्यात ४३.२ मि.मी. तर सर्वात कमी लाखांदूर तालुक्यात १७.४ मि.मी. पावसाची नोंद पर्जन्यविभागात करण्यात आली आहे. यावर्षी मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ५५९.३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असतानाच जिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यात दि.६ आॅगस्टपर्यंत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचेही प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले.