लाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी
By Admin | Updated: September 21, 2014 23:45 IST2014-09-21T23:45:53+5:302014-09-21T23:45:53+5:30
जिल्ह्यातील महावितरणचे अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमनला मुख्यालयाची

लाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी
भंडारा : जिल्ह्यातील महावितरणचे अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमनला मुख्यालयाची अॅलर्जी झाली का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने गावातील रोहित्रावरून वीज पुरवठा खंडीत झाला की गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील गेल्या कित्येक महिन्यापासून रोहित्रावरून शेतातील एकच फेज वारंवार बंद पडतो. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्याला दुरुस्तीला वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी व गावातील नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाईनमनशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ग्राहकांचे कुठलेही उत्तर मिळत नाही.
पाऊस सुरु असताना वा इतर कोणत्याही परिस्थितीचा अडचण भासणार नाही. यासाठी वीज दुरुस्ती करताना सर्व व्यवस्था वा साधने महावितरणने कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्यांना समस्येबद्दल सांगितले असता अनेक कारणे सांगून सध्या काम होऊ शकणार नाही अशी कारणे दिली जातात.
पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना प्रकर्षाने जाणवतो. संततधार पाऊस सुरु असला तर संपूर्ण गावाला पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागत असल्याची स्थिती असते. उडवाउडवीची उत्तरे महावितरणचे कर्मचारी नेहमीच देत असल्याचे गावकरी सांगतात.
गावातील नागरिकांच्या वा शेतकऱ्यांच्या वीज दुरुस्तीच्या काही समस्या असल्या तर त्यावर संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्वरीत कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना वा ग्राहकांना आपल्या वीज दुरुस्तीसंबंधी समस्या त्वरित दुरुस्त करायची असली तर तालुका अभियंता वा उपअभियंता यांना संपर्क करावा लागतो. नंतरच ग्राहकांच्या, शेतकऱ्यांच्या तक्रारीवर अंमलबजावणी केली जाते. अन्यथा खासगी कारागीराकडून दुरुस्ती करून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो किंवा लाईनमनला सतत विनवणी करावी लागते. रात्रीला महावितरणचा एक कर्मचारी (लाईनमन) गावात राहावा अशी गावातील नागरिकांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करून गावात महावितरणच्या एक लाईनमेनला तरी मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
वरिष्ठांकडे तक्रार
शेतकऱ्यांना वा ग्राहकांना आपल्या वीज दुरुस्ती संबंधी समस्या त्वरीत दुरुस्त करायची असली तर तालुका अभियंता वा उपअभियंत्याना संपर्क करावा लागतो. नंतरच ग्राहकांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवर अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत असून कारवाईची मागणी केली जात आहे. वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या आता झडशी येथे नित्याचीच झाली आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर तो पूर्ववत करण्यासाठी नागरिक लाईनमनशी संपर्क करतात. परंतु अनेकदा त्यांच्याशी संपर्कच हणोत नाही. संपर्क झालाच तर त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
विशेष म्हणजे हा कर्मचारी गावात राहणे अत्यावश्यक आहे. परंतु तो मुख्यालयी राहत नाही. पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. अशावेळी दुरुस्ती करण्यात येत नसल्याने पाऊस थांबेपर्यंत वाट पाहावी लागते. बरेचदा दोन तीन दिवस नागरिकांना अंधारात काढावे लागतात. (प्रतिनिधी)