पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळा

By Admin | Updated: April 23, 2016 00:36 IST2016-04-23T00:36:58+5:302016-04-23T00:36:58+5:30

पाणी टंचाईबाबत खंड विकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करावे.

Handling the water scarcity questionably | पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळा

पाणीटंचाईचा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळा

आढावा बैठक : दीपक सावंत यांचे प्रतिपादन
भंडारा : पाणी टंचाईबाबत खंड विकास अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर घेतलेल्या बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करावे. जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न प्रशासनाने संवेदनशिलपणे हाताळावा आणि पाणी टंचाई असणाऱ्या गावात तात्काळ उपाय योजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. दिपक सावत यांनी दिलेत.
जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, खासदार नाना पटोले, आमदार सर्वश्री अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधिक्षक विनीता साहू, कृषि सभापती नरेश डहारे उपस्थित होते.
यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे पाणी टंचाईबाबतचे नियोजन आधिच करावे, अशा सूचना बैठकीत दिल्या नंतरही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, अशी खंत खासदार पटोले यांनी व्यक्त केली.
पाणी टंचाईची बैठक खंड विकास अधिकारी घेत नाहीत, असा आरोप आमदारांनी केला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मैदमवार यांनी खंड विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्याचे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी बैठकीचे कार्यवृत्त तात्काळ सादर करण्याच्या सूचना केल्यात. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे ज्या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे तात्काळ विंधन विहिरी व हातपंप दुरुस्त करावेत. पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत कोरडे पडत असल्यामुळे बावणथडी आणि पेंचप्रकल्पामधून पाणी सोडण्याची मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी समिती समोर ठेवली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लगेच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. वैनगंगेचे पाणी दुषित झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशपूर सारख्या गावात लोक पाणी विकत घेत आहेत. अशा गावांमध्ये जल शुध्दीकरणयंत्र उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. याबाबत भंडारा व पवनी या तालुक्यामध्ये जल शुध्दीकरण यंत्र लावण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्यात. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Handling the water scarcity questionably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.