न्यायदूत उपक्रमातून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:49 IST2018-12-07T21:48:50+5:302018-12-07T21:49:06+5:30
न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित असलेल्या व्यक्तींसाठी नऊ डिसेंबर रोजी कवडसीसह इतर १० गावांमध्ये न्यायदूत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यायदूत उपक्रमातून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित असलेल्या व्यक्तींसाठी नऊ डिसेंबर रोजी कवडसीसह इतर १० गावांमध्ये न्यायदूत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात हायकोर्ट बार असोशिएशनच्या माध्यमातून विविध समस्यांचे व प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भंडारा तालुक्यातील कवडसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल लागणार असून या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कवडसी येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या हस्ते न्यायदूत उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायधिश संजय देशमुख प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. गणेशपूर, कोरंबी, पिंडकेपार, बेला, दवडीपार, सालेबर्डी, कवडसी, पेवठा, लोहारा, चिचोली व पिपरी या भंडारा तालुक्यातील ११ गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत वकीलांची चमु नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेवून मार्गदर्शन करणार आहे.
शासनाच्या विविध योजनांची जनतेला माहिती उपलब्ध करुन देणे व योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देणे. आवश्यकता भासल्यास वरील समस्या सोडविण्यासाठी उच्च न्यायालायात जनहित याचिका दाखल करणे हा न्यायदूत उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा लाभ गोरगरीब व वंचित नागरिकांना व्हावा यासाठी हा उपक्रम भंडारा तालुक्यातील ११ गावात आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.ए. कोठारी, अॅड. अनिल किलोर, अॅड. कैलास भूरे, अॅड. विजय मोरांडे, अॅड. अतुल पांडे, अॅड. जयंत बिसेन व अॅड. प्रफ्फूल खुबाळकर यांनी केले आहे. २