ग्रामसभा ठरल्या कुचकामी
By Admin | Updated: March 19, 2015 00:39 IST2015-03-19T00:39:52+5:302015-03-19T00:39:52+5:30
कोणत्याही गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या ग्रामसभेला संबंधित गावातील प्रत्येक कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

ग्रामसभा ठरल्या कुचकामी
तुमसर : कोणत्याही गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या ग्रामसभेला संबंधित गावातील प्रत्येक कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र ग्रामस्थ उदासीन असल्याने ग्रामसेवक वगळता ग्रामस्थांसह इतर सर्वच कर्मचारी ग्रामसभेकडे पाठ फिरवीतात. परिणामी या ग्रामसभा आता कुचकामी ठरत आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभांचे आयोजनही केले जाते. या ग्रामसभेत नियोजन व सनियंत्रण केले जाते. त्यात अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करावयाची असते. मात्र, ग्रामस्थच त्याबाबत प्रचंड उदासीन आहेत. परिणामी ग्रामसभेला ग्रामसेवकासह ग्रामपंचायतीचे निवडक पदाधिकारी तेवढे उपस्थित दिसतात. अत्यंत कमी प्रमाणात ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित राहतात. या ग्रामसभेला गावातील विविध समितीचे सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक-सेविका, कृषी सहाय्यक, वन कर्मचारी, पशू सहाय्यक, पोलिस पाटील, वीज कर्मचारी, तलाठी आदी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र ते उपस्थितच राहत नाही असे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे ही ग्रामसभाच वांझोटी ठरत आहे. निवडक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या तालावर ग्रामसभा नाचत आहे.
ग्रामसभेकडे जवळपास सर्वच कर्मचारी बहुतांश ग्रामस्थ पाठ फिरवीत असल्याने त्या गावाचा विकास खोळंबतो. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षातच येत नाही. या ग्रामसभेत गावातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपापल्या कामाचा आढावा, तसेच शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे आवश्यक नव्हे तर बंधनकारक आहे. तरीही कर्मचारी पाठ फिरवितात. त्याबाबत कुणी तक्रारही करीत नाही. त्यामुळे कर्मचारी शिरजोर झाले आहे. संबंधित गावातील कर्मचारी जर ग्रामसभेला कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित असतील, तर त्यांच्याविरुध्द गटविकास अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. त्यांची वेतनवाढ रोखण्याचेही निर्देश शासनाने दिले आहे. तथापि राज्य शासनाच्या या आदेशांची कोणत्याही गावात अंमलबजावणी होताना दिसत नाही. ग्रामस्थच उदासीन असल्यामुळे कर्मचारी सोकावले आहे. ग्रामस्थांना मिळत नाही. ग्रामस्थाना विविध योजनांचीही निट माहिती मिळत नाही. ग्रामस्थच मिळत नाही. ग्रामस्थांना विविध योजनांचीही निट माहिती मिळत नाही. ग्रामस्थच ग्रामसभेला चाट मारित असल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. सोबतच मुठभर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्ताधारी आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेऊन मोकळे होत आहेत. नंतर मात्र हेच ग्रामस्थ ओरड करतात. त्यामुळे वेळ निघून गेलेली असते. या प्रवृत्तीत सुधारणा झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचं गाव आमचं सरकार ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)