पुनर्वसित टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत द्या
By Admin | Updated: September 18, 2016 00:38 IST2016-09-18T00:38:09+5:302016-09-18T00:38:09+5:30
पुनर्वसित जुनी टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजकपुर राऊत यांचे नेतृत्वात...

पुनर्वसित टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत द्या
काँग्रेस कमिटीची मागणी : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : पुनर्वसित जुनी टाकळीला स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजकपुर राऊत यांचे नेतृत्वात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) विजया बनकर यांना देण्यात आले.
पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसीत ग्रामपंचायत स्थापन करावयाचे असल्यास किमान लोकसंख्या ३५० एवढी आवश्यक आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जुनी टाकळी पुनर्वसनाची लोकसंख्या ४४७ एवढी आहे. शासनाच्या निकषानुसार स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. याकरिता ग्रामपंचायतने मासिक सभेचे व ग्रामसभेचे अनेकदा ठराव करून पाठपुरावा केला असून सुद्धा शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
जुनी टाकळी पुनर्वसन या गावाला महसुली दर्जा प्राप्त झाला असून या गावातील नागरिकांचे सार्वजनिक प्रगती व हीत जोपासून शासनाने अधिग्रहीत केलेल्या नियमानुसार जुनी टाकळी पुनर्वसन व गावाला त्वरीत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अन्यथा भंडारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. सदर निवेदन देताना शहर अध्यक्ष सचिन घनमारे, पंचायत समिती सदस्या अनिता नागफासे, संदेश शामकुवर, सेवकराम नागफासे, शर्मिल बोदेल, रवी कांबळे, घनश्याम शेंडे, गौरीशंकर बोरकर, वासुदेव शहार, भाऊदास बोरकर, राधेश्याम भुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)