चार लघु प्रकल्प तुडूंब
By Admin | Updated: August 22, 2015 00:55 IST2015-08-22T00:55:31+5:302015-08-22T00:55:31+5:30
आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढ झालेली आहे.

चार लघु प्रकल्प तुडूंब
जलसाठ्यात वाढ : ६३ प्रकल्पात ४१.१४ टक्के जलसाठा,
देवानंद नंदेश्वर भंडारा
आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढ झालेली आहे. या पावसामुळे चार लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत.
जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत एकूण ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. तुडूंब असलेल्या प्रकल्पांमध्ये नागठाणा, मंडनगाव, भूगाव मेंढा, वाकल या गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार प्रकल्पांमध्ये १३.७५४ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ३२.१२ एवढी आहे. यामध्ये चांदपूरमध्ये ३४़५३ टक्के, बघेडा ४४़९३ टक्के, बेटेकर बोथली १६.८८ टक्के आणि सोरणा प्रकल्पामध्ये १९ टक्के जलसाठ्याचा समावेश आहे़
भंडारा जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार येथील तलावांचा समावेश आहे.
या लघु प्रकल्पांमध्ये एकूण २३.९५६ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ४४.७४ एवढी आहे. ३१ लघु प्रकल्पांपैकी ४ प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत़ २८ माजी मालगुजारी तलावात सध्यास्थितीत २५ ते ९० टक्के जलसाठा आहे.
सध्यस्थितीत १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्के, २२ प्रकल्पांमध्ये ५० टक्के, १३ प्रकल्पांमध्ये ७५ टक्के, १० प्रकल्पांमध्ये ९० टक्के, चार प्रकल्पांमध्ये ९९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़
आॅगस्ट महिन्यापर्यत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पावसाच्या आगमनामुळे रखडलेल्या रोवणी कामाला वेग आला असून रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे.
यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात ५०़१२४ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील वर्षी २१ आॅगस्ट पर्यंत जिल्हयातील ६३ प्रकल्पात ७१.७४९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त जलसाठा होता़ त्याची टक्केवारी ५८.६१ एवढी होती.