तंत्रशिक्षणातून जीवनात आनंदाची बाग फुलवा
By Admin | Updated: January 25, 2015 23:09 IST2015-01-25T23:09:02+5:302015-01-25T23:09:02+5:30
तांत्रिक शिक्षणामुळे युवकांच्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि त्यातून देशाच्या तांत्रिक विकासाला काय हातभार लागू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिक शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात

तंत्रशिक्षणातून जीवनात आनंदाची बाग फुलवा
साकोली : तांत्रिक शिक्षणामुळे युवकांच्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि त्यातून देशाच्या तांत्रिक विकासाला काय हातभार लागू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिक शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खासगी क्षेत्रात अधिक वाव आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या युवकांची येणाऱ्या काळाची गरज आहे. त्यामुळे तंत्रशिक्षणाची कास धरा, जीवनात आनंदाची बाग फुलवा, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. आरेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१४-१५ यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील प्राचार्य डॉ. मनीष बिहाडे, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य मनीष लेंढे उपस्थित होते. दरम्यान, मेळावा परिसरात विविध महाविद्यालयाकडून लावण्यात आलेल्या स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यात नागपूर भंडारा, वरठी, देवरी, उमरेड येथील विविध तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाचा इन्स्टिटयूटचा समावेश होता. मेळाव्यातील मार्गदर्शन ऐकण्यासाठी तालुक्यातील एकोडी, बाम्पेवाडा, किन्ही, जांभळी/सडक, वडेगाव, साकोली, सेंदुरवाफा, उमरी, सातलवाडा, पिंडकेपार, सानगडी, कुंभली येथील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकडोच्या संख्येत हजेरी लावली.
दुपारच्या सत्रात नागपूर येथील आशिष शर्मा यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना गौरविण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य अनिरुध्द अभ्यंकर तर संचालन व आभार प्रा. रजनी गायधनी यांनी केले.
कार्यक्रमासाठी एस. सी. तोडासे, एस. सी. ठाकरे, व्ही. पी. बघेले, प्रा. अनिल सार्वे, प्राचार्य पुष्पराज झोडे, राकेश चकोले, प्रा. तृप्ती वासनिक, प्रा. अश्विनी रंगारी, प्रा. रुपाली सोनडवले, प्रा.विशाल परशूरामकर, रवी भोंगाने तसेच वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)