आवळीतील पाच कुटुंब भोगताहेत नरकयातना
By Admin | Updated: April 26, 2015 00:34 IST2015-04-26T00:34:20+5:302015-04-26T00:34:20+5:30
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे आवळी. सन १९६२ च्या पुरामुळे सदर गाव हादरून गेले.

आवळीतील पाच कुटुंब भोगताहेत नरकयातना
प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यथा नदीकाठावरील पुनर्वसनग्रस्तांची
प्रमोद प्रधान लाखांदूर
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव म्हणजे आवळी. सन १९६२ च्या पुरामुळे सदर गाव हादरून गेले. प्रशासनाने दखल घेवून आवळी गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन केले. मात्र येथील अजूनही पाच कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. प्राथमिक सुविधांपासून वंचित असलेले हे कुटुंब नरकयातना भोगत आहेत.
विकासात्मक योजना या गावापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. चारही बाजूला नदी असल्यामुळे नावेच्या सहायाने जीवघेणा प्रवास करून येथील विद्यार्थी व शेतकरी रहदारी करीत असतात. पुरसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास तेव्हाच नागरिकांना बाहेर काढण्याचे सोपस्कार पार पाडले जाते. नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न केव्हा सुटणार हे निश्चित नाही. पुराचा विषय आवळी येथील नागरिकांसाठी नवीन नाही. लाखांदूरपासून १२ कि़मी. अंतरावर नदीकाठावर वसलेले आवळी गाव नागरी सुविधापासून वंचित आहे. सन १९६२ च्या पुरानंतर येथील ६३ भूमिधारी कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले.
आवळी येथील शेतजमिनीच्या मोबदल्यात तिपटीने व राहत्या घराच्या जागेएवढी इंदोरा येथे ७०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. पुनर्वसन म्हणून गावठान व खतकुळ्याची जागाही देण्यात आली. परंतु यावर अतिक्रमण झाल्यामुळे गावकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला. मात्र आठ भूमिहिनांना यातून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जमीन कसली. १९८८ ला शासकीय नियमानुसार सात बारावर नोंद घेण्यात आली.
येथील रहिवासी ज्योतिराम शहारे, रामचंद्र कांबळी, उद्धव शहारे, निजाम मेश्राम, एकनाथ वकेकार यांनी वेळोवेळी पुनर्वसन संदर्भात प्रशासनाला निवेदने सादर केली. लोकप्रतिनिधींपुढेही समस्या मांडल्या. मात्र काहीही उपयोग झाला नाही. पुनर्वसनग्रस्तांना १८ नागरिक सुविधा मिळाल्या पाहिजे, असा शासकीय नियम आहे. परंतु या नियमांना बगल दिली जात आहे.
पाच कुटुंब वंचित
आवळी येथील ६३ शेतकरी कुटुंबाचे पुनर्वसन असले तरी अजूनही दोन कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. या गावात रस्ते नाहीत, पाण्याची व शिक्षणाचीही सुविधा नाही. अशा स्थितीत या पाच कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.
गावात रस्ते नसल्याने जिथून मार्ग निघेल तिथून वाट काढली जाते. चुलबंद नदी ओलांडून गावात यावे लागत असल्याने विद्यार्थी व शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाली शोधूनही सापडत नाही. परिणामी येथे साथीच्या रोगाची लागण होत असते. अनेक वर्षापासून रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. जिल्हा परिषद क्षेत्र लाभलेल्या या भागातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा आहे.