शेतकरी आत्महत्या प्रकरणी आर्थिक मदत करा
By Admin | Updated: June 24, 2017 00:30 IST2017-06-24T00:30:50+5:302017-06-24T00:30:50+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्येचे सत्र सुरु होते अशा परिस्थितीतही पूर्व विदर्भात विशेष करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होते.

शेतकरी आत्महत्या प्रकरणी आर्थिक मदत करा
जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्येचे सत्र सुरु होते अशा परिस्थितीतही पूर्व विदर्भात विशेष करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होते. परंतु मागील दोन वर्षांत याही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने चिंता व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.
ताराचंद शेंद्रे शेतकरी आत्महत्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना योग्य तपास करून अहवाल सादर करण्याचे मौखिक आदेश दिले. प्रत्येक शेतकरी संभ्रमात आहे की त्याचे कर्ज कुठल्या नियमांतर्गत माफ होईल. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यांतर्गत येणाऱ्या जांभोरा या गावातील ताराचंद शेंद्रे यांनी त्यांच्या शेतात दिनांक १६ जून २०१७ ला स्वत: सरण रचून स्वत:ला जाळून घेतले.
सततच्या नापिकीमुळे व हात उसनवारी कर्जापणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. सदर शेतकरी आत्महत्या प्रकरण विशेष बाब म्हणून महाराष्ट्र सरकारने स्विकारावी व शासनातर्फे आर्थिक मदत करावी, मुलगा अंशकालीन प्रथम मजूर असल्यामुळे त्याला नोकरीत सामील करून घ्यावे, शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केले. यावेळी प्रमोद तितिरमारे, महेंद्र निंबार्ते, अमरनाथ रगडे, प्रभुजी मोहतुरे, आणिक जमा पटेल, प्रशांत देशकर, सचिन फाले, वामन तिडके, कैलास नागदेवे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.