अखेर बोअरवेलची थकीत रक्कम मिळाली
By Admin | Updated: September 17, 2015 00:32 IST2015-09-17T00:32:29+5:302015-09-17T00:32:29+5:30
वर्षभर कार्यालयात हेलपाटे मारून बोअरवेलचे पेमेंट न मिळाल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने चक्क प्रशासनाला आत्महत्येचे अल्टीमेट दिले होते.

अखेर बोअरवेलची थकीत रक्कम मिळाली
अधिकारी धास्तावले : कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवी
पालांदूर : वर्षभर कार्यालयात हेलपाटे मारून बोअरवेलचे पेमेंट न मिळाल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने चक्क प्रशासनाला आत्महत्येचे अल्टीमेट दिले होते. याबाबत लोकमतने दि. ११ सप्टेंबरला वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच प्रशासनात खळबळ उडून अगदी चार दिवसात शेतकरी बशिरखाँ हफिजखाँ पठाण यांनी १६ हजार ५२८ रुपयांचा धनादेश ग्रामपंचायत पालांदूरला ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रदान करण्यात आला.
पालांदूर येथील शेतकरी बशीर पठाण यांनी २०१३-१४ मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिर व बोअरवेल खोदली. त्यासाठी लागणारे सर्व कागदोपत्री सोपस्कार ग्रामपंचायत पालांदूर मार्फत पूर्ण केले. मात्र, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, काम पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्याला धनादेश देण्यास विलंब लागत होता. याबाबत लाभार्थ्याने तालुका, जिल्ह्या, आयुक्त कार्यालय नागपूरला पत्रव्यवहार केला. परंतु प्रशासनाला जाग आली नाही. कर्जाची रक्कम बोअरमध्ये खर्च झाल्याने शेतकरी आर्थिक खाईत खितपत पडला होता. विहिरीची रक्कम मिळाली. परंतु बोअरचे १६ हजार ५२८ एवढा निधी मिळाला नव्हता. तेव्हा अन्यायग्रस्ताने लोकमतकडे गाऱ्हाणी मांडली. लोकमतने लाभार्थ्याची बाजू वृत्तपत्रात प्रकाशित केली. वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खळबळून जागे झाले आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी च्या शिल्लक फंडातून १६ हजार ५२८ रुपयांचा धनादेश शेतकऱ्याला दिला. (वार्ताहर)