भरधाव ट्रकने इसमाला चिरडले
By Admin | Updated: October 27, 2015 00:35 IST2015-10-27T00:35:22+5:302015-10-27T00:35:22+5:30
रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सहायक वीज कर्मचाऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले.

भरधाव ट्रकने इसमाला चिरडले
ट्रक चालकाला अटक : जिल्हा परिषद चौकातील घटना, चौक ठरतोय धोकादायक
भंडारा : रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या सहायक वीज कर्मचाऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले. यात त्याला ट्रकने सुमारे एक कि.मी. फरफटत नेल्याची हृदयद्रावक भीषण घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद घडली.
प्रदीप रविभाऊ उमाठे (३१) रा.एम.एस.ई.बी. वसाहत भंडारा असे मृतकाचे नाव आहे. मृतक प्रदीप हा मुळचा कोराडी येथील रहिवासी असून दोन महिन्यापूर्वीच तो भंडारा महावितरण विभागात रूजू झाला होता. नित्याप्रमाणे त्याची रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत टाकळी सबस्टेशनमध्ये ड्युटी होती. त्यामुळे तो नागपूर मार्गावरील मुख्यालयातून कर्तव्यावर जाण्यासाठी आपल्या एका सहकाऱ्याच्या दुचाकी एम.एच. ३६-४५१३ ने रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एकटाच निघाला होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील जिल्हा परिषद चौकात असलेल्या एका बिअरबारमधून दारु पिऊन चारचाकीतील काही जण निघाले. यांनी प्रदीपच्या दुचाकीला धडक दिल्याने तो राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीसह कोसळला. दरम्यान नागपूरकडून भरधाव आलेला ट्रक सी.जी. ०४ - डीएम ७३५७ च्या पुढील चाकात तो चिरडल्या गेला. दुचाकीसह तो ट्रकमध्ये फसल्याने ट्रकचालकाने त्याला कारधा मार्गावरील बैलबाजार चौकापर्यंत सुमारे एक कि.मी. पर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात प्रदीपचा ठार झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला. सदर ट्रक चालकाला बैलबाजार परिसरात अडवून त्याची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. या भीषण अपघातानंतर मृतकाचे शरीर छिन्नविछिन्न झाल्याने त्याची ओळख पटण्यात बराच विलंब लागला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. (शहर प्रतिनिधी)
कुटुंबावर कोसळले दु:खाचे डोंगर
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील मुळच्या प्रदीपच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. दोन महिन्यापूर्वीच तो भंडारा येथील महावितरणच्या दक्षिण क्षेत्रात रूजू झाला. त्याच्या मागे पत्नी, दीड वर्षाची मुलगी, भाऊ व आईवडील असा परिवार आहे. प्रदीपच्या नोकरीवर रूजू होण्याने त्याची परिस्थिती सुधारेल अशी आशा आईवडिलांना होती. मात्र नियतीला हे मान्य नसल्याने काळाने त्याच्यावर झेप घेऊन कुटुंबातून त्याला हिरावले. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने उमाठे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.