अशक्त मुले जन्माला येण्याची भीतीही वाढली
By Admin | Updated: April 25, 2015 00:51 IST2015-04-25T00:51:16+5:302015-04-25T00:51:16+5:30
जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा दिवस दूध साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीपासून सुरू होतो...

अशक्त मुले जन्माला येण्याची भीतीही वाढली
प्लास्टिकच्या अतिवापराने प्रजनन क्षमता धोक्यात !
भंडारा : जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा दिवस दूध साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीपासून सुरू होतो. रात्री भाजीपाला आणलेल्या प्लास्टिकच्याच पिशवीने मावळतो. यादरम्यान दिवभर कधी प्लास्टिकची पाण्याची बादली तर कधी प्लॉस्टिकच्या टिफिनमधील जेवण असा प्लास्टिकशी सारखा संबंध येत असतो. परंतु याच प्लास्टिकच्या वापराचे पर्यावरणासह मानवी आरोग्याला विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या बिसफिनाल या घटकाचा सर्वात मोठा धोका पुरूषांच्या प्रजनन क्षमतेला बसत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. काशी विश्वविद्यालयातील चिकित्सा विज्ञान संस्थेच्या इंड्रो क्राईम विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. नीरजकुमार अगरवाल यांनी नुकतेच प्लास्टिकवर संशोधन केले. त्यात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
उंदरावर केला प्रयोग
प्लास्टिकमध्ये आढळणारा बिसफिनॉल हा घटक थंड अथवा गरम खाद्य पदार्थांमधून मानवी शरीरात सहज प्रवेश करतो. गरम असताना तो अत्यंत घातक ठरत असल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. अगरवाल यांनी एका नर जातीच्या उंदरावर थंड व गरम अवस्थेत प्लास्टिकचा प्रयोग केला. यावेळी बिसफिनॉल हा घटक नर जातीच्या उंदराच्या शरीरात गेल्यानंतर मादीच्या हार्माेन्ससारखा कार्य करीत असल्याचे निदर्शनास आले. पुरूषांमध्ये बिसफिनॉलची मात्रा अधिक प्रमाणात झाल्यास शुक्रानुंच्या शंकेवर त्याचे विपरीत परिणाम जाणवू लागतात. त्यामुळे प्रजनन क्षमता कमकुवत बनते. तसेच अशक्त मुले जन्माला येतात.
प्लास्टिकचा कचरा
म्हणजे राक्षसच!
शहरात कुठेही बघा अगदी सर्रास प्लास्टिक पेटविले जाते. त्याच्या घातक धुराने फुफ्फुस आजारी पडताहेत. नागरिकांच्यात बेफिकीर वागण्यात याचे मूळ दडले आहे. याची सुरूवात होते घरापासून. म्हणूनच एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू घरात आणण्यापूर्वी चार वेळा विचार करा.
सर्वत्र सर्वाधिक कचरा असतो तो अशाच 'युज एन्ड थ्रो' वस्तूचाच! पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असतानाच जमिनीच्या उत्पादकतेतही त्यामुळे फरक पडला आहे. जमिनीच्या पोटात जावून मातीचा स्तर बिघडविणाऱ्या या वस्तुंमुळेच पिकाचा दर्जा घसरला आहे. एकूणच सर्वच स्तरावर विपरीत परिणामक करणाऱ्या प्लास्टिकने वसुंधरेवर एकप्रकारे हल्लाच केला आहे.
वसुंधरेच्या बचावासाठी वापरा कागदाचे पेपर कप
आपल्याकडे महिन्याला शेकडो गाड्यांमधून प्लास्टिक कप शहरात येतात. कचरा पुन्हा गोळा होतो तेव्हा एक ट्रकही येत नसतो. याचा अर्थ प्लास्टिकचा माल ड्रेनेज, शेतांमध्ये पसरतो. त्या जमिनीत त्याचे विघटन होत नाही. हा माल जमिनीची पोत खराब करतो आहे. हा कप बनविण्यासाठी चप्पला, बुट, सिरीज यांचा वापर केला जातो. त्यात असलेला ग्रॅनिव्हल हा घटक वापरला जातो. त्याचा कप तयार झाल्यानंतर त्यात चहा अथवा शरबत दिले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्यातून प्रवाहित होते आणि ते पोटात जाते, अशा पद्धतीने प्रादुर्भाव होत राहिला तर मोठी हानी होईल. आताचे वातावरण निसर्गाने मानवाला दिलेली सूचना आहे. त्यावर वेळीच आवर घातला नाही तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते.
बिसफिनाल ठरतोय
व्हिलेन
एक उदाहरण...
एका मुलाचा दुसरा की तिसरा वाढदिवस. त्यानिमित्त जवळपासचे लहान मुल, लोक येणार होते. शंभर एक जण असतील. कार्यक्रम म्हटलं की खाण आलं. पदार्थ आले. ते कशात घ्यायचं तेही आलं. घरात नेहमीच्या बारा-तेरा प्लेट लोकं घरी आलेले असताना पुन्हा पुन्हा कोण धूत बसणार? मग स्वस्तात मस्त अशा प्रकारचे प्लॉस्टिकचे ट्रे आणि कप मागवण्यात आले. तो वाढदिवस तर जोरात साजरा झाला. परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घंटागाडीत पोतंभर प्लास्टिकचा कचरा टाकण्यात आला. त्यात खाण्यासाठी वापरलेले साहित्य तर होतेच परंतु त्याबरोबरच वाढदिवसासाठी आणलेल्या साहित्याचाही समावेश होता. घरातील व्यक्तीच जर लहान मुलांसमोर अशी चॉईस ठेवत असतील तर भविष्यात या कचऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार नाही कशावरून.
पर्यावरणाची
केमेस्ट्री ओळखा
आजच्या वातावरणात आपण पर्यावरणाशी व्यस्त प्रमाणात अभिक्रिया करत असतो व त्यामुळे वेगवेगळ्या उद्योग धंद्यातून बाहेर पडणारे रासायनिक घटक हे सहजपणे माती, पाणी आदींमध्ये एकत्रित झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. या वेगवेगळ्या घटकामुळे वातावरणातील हवा देखील दूषित होऊन ओझोनचा थर पातळ होवून कठोर सूर्यकिरण जमिनीवर पोहोचून माती व पाणी या दोन्हीवरही परिणाम करत आहेत. पर्यायाने आपल्या सजीव सृष्टीला हा त्रास पावलोपावली जाणवतोय. सर्व मानव जातीला यातून जाताना आजार, अकाली मृत्यू व इतर नैसर्गिक आपत्तींना स्वत:हून सामोरे जावे लागत आहे. यासाठी आपण पर्यावरणाशी केमेस्ट्री जुडवून घ्यायला हवी.