चुकीच्या शेतजमीन मोजणीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:34 IST2017-01-08T00:34:19+5:302017-01-08T00:34:19+5:30
भावड येथील शेतजमिनीची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी केली.

चुकीच्या शेतजमीन मोजणीचा फटका
शेतकऱ्याला न्यायाची अपेक्षा : भूमिअभिलेख कार्यालय पवनी येथे अनेकदा हेलपाटे
कोंढा (कोसरा) : भावड येथील शेतजमिनीची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी केली. त्यांनी दुसऱ्या मोजणीत गट क्र. ८८५ मध्ये गट क्र. ८८५ च्या मालकाची जागा दाखविल्याने शेतकऱ्यामध्ये भांडणे लावली. सध्या भूमापक पी. जी. गोस्वामी मृत्यू पावले. त्यामुळे अन्याय झालेल्या महिला शेतकरी राजश्री रामकृष्ण हेमणे यांनी वरिष्ठांना अनेकदा तक्रार करुन देखील न्याय मिळाला नसल्याची तक्रार केली आहे.
उपअधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय, पवनी हे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोजमाप, पोटहिस्सा मोजणी तसेच इतर कामे करण्यासाठी शासनाचे कार्यालय आहे. पण येथे कुणाचे नियंत्रण नाही. कर्मचारी केव्हाही येतात जातात असे दृष्य पहावयास मिळते. उपअधिक्षक सय्यद यांचेकडे पवनी व्यतिरिक्त लाखांदूर कार्यालयाचा चार्ज असल्याने ते देखील कार्यालयात अत्यल्प दिसतात. शेतकऱ्यांची तक्रार ऐकूण घेणारे कुणी अधिकारी नाही. सहाय्यक शिंदे यांच्यावर सध्या कार्यालय चालू आहे.
भावड येथील शेतकरी राजश्री रामकृष्ण हेमणे यांच्यामार्फत त्यांचे पती रामकृष्ण हेमणे अनेकदा या कार्यालयात आपली कैफीयत मांडण्यासाठी गेले. पण त्यांना खाली हाताने निराश होऊन चार, पाचदा परत यावे लागले आहे. त्यांची शेतजमीन भावड येथे आहे. कोंढा बेलाटी रोडलगत त्यांच्या शेजारी असलेले शेतकरी भास्कर मारोती अनकर यांनी त्यांची जमिन भु.क्र. ८८६ हेक्टर आर. ०.६ ची मोजणी १० डिसेंबर २०१३ ला केली. भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी मोजणी केली व हद्द कायम केली. परंतु भास्कर मारोती अनकर रा. भावड यांनी पुन्हा मोजणीचे पैसे भरुन १८ जुलै २०१४ ला दुसऱ्यांचा पी. जी. गोस्वामी यांचेकडून मोजणी केली.
या मोजणीमध्ये भूमापकांनी भास्कर मारोती अनकर यांची जमिन गट क्र. ८८६ मध्ये दाखवून शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावली आणि राजश्री रामकृष्ण हेमणे यांच्या जमिनीच्या गटात दाखवून हद्द कायम केली. आम्ही त्याचा विरोध केला तरी भुमापकाने कोणाचेही न ऐकता भास्कर अनकर यांना माझ्या जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्यास सांगितले आणि शेतकऱ्यामध्ये भांडणे लावली.
भुमापक पी. जी. गोस्वामी यांनी एकच जमिनीची दोनदा मोजणी करुन वेगवेगळी हद्द कायम केली दुसऱ्या मोजणीच्या वेळी लगतच्या शेतकऱ्याच्या सह्या त्यांनी मोजणी योग्य न वाटल्याने केल्या नाही. तरी हद्द कायम केली. याची तक्रार भूमिअभिलेख भंडारा यांना केली.
उपअधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय पवनी यांना ६ जानेवारी २०१५ ला पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्यास सांगितले. कार्यालयास वकिलाकडून नोटीस देखील दिले. पण याचा काही उपयोग झाला नसून त्यांना उपअधिक्षक कार्यालयाकडून कार्यवाही सुरु आहे असे मोगम उत्तर कर्मचारी देत आहेत. मालकीच्या गटात जमीन आहे असे दाखवून भास्कर अनकर यांनी जबरदस्तीने शेतजमीनीचा काही भाग कब्जामध्ये घेतला हे कोणत्या न्यायात बसते असा प्रश्न राजश्री हेमने यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक रामकृष्ण हेमने यांनी केले आहे. सध्या उपअधिक्षक कार्यालयाच्या अनेक हेलपाट्या मारल्या पण कोणीही समाधानकारक उत्तरे दिले नाही.
उपअधिक्षक सय्यद हे तर कधीच भेटले नाही. सध्या दोनदा जमिनीची मोजणी भेटले नाही. सध्या दोनदा जमिनीची मोजणी करणारे भुमापक मृत्यू पावले. त्यामुळे या प्रकरणाची दुसऱ्या नि:पक्ष भूमापकाकडे हे प्रकरण देऊन याची योग्य चौकशी करुन मला माझी शेतजमीन परत मिळवून देण्याची मागणी राजश्री हेमणे व त्याचे पती रामकृष्ण हेमणे यांनी केले आहे. यासंबंधात सदर प्रतिनिधीने उपअधीक्षक, सय्यद यांची पवनी येथे जाऊन दोनदा भेट घेण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही. (वार्ताहर)