भविष्याच्या अनावृष्टीने शेतकरी भांबावला
By Admin | Updated: May 13, 2014 23:20 IST2014-05-13T23:20:26+5:302014-05-13T23:20:26+5:30
यंदा संपूर्ण उन्हाळा नियमितपणे वादळ-वारे अन् पाऊस यामुळे जमिनीची मशागतीअभावी वाताहत सुरू झाल्याने पुढील खरीप हंगामावर परिणाम होणार आहे.

भविष्याच्या अनावृष्टीने शेतकरी भांबावला
भंडारा: यंदा संपूर्ण उन्हाळा नियमितपणे वादळ-वारे अन् पाऊस यामुळे जमिनीची मशागतीअभावी वाताहत सुरू झाल्याने पुढील खरीप हंगामावर परिणाम होणार आहे. तर यंदा पावसाळ्यात पाऊस कमी बरसणार असल्याच्या अंदाजाने तर शेतकरी पुरता भांबावून गेला आहे. भंडारा जिल्हय़ात जसा उन्हाळा हंगाम सुरू झाला तसा वादळ वारा, पाऊस सुरु झाला. दिवसभर कडक ऊन व सायंकाळी वादळ वारे, विजेच्या कडकडाट अन् सर्वत्र पाऊस यामुळे कोरडवाहू तालुक्याची हजारो हेक्टर जमीन ही पेरणीपूर्व मशागतीअभावी तशीच पडून आहे. शिवाय या जमिनीत थंड्-गरमपणा होऊन जमिनीचा तप्तपणा लुप्त पावल्याने याचा आगामी खरीप हंगामावर परिणार होणार आहे. एकाचवेळी जमीन तापतही आहे व एकाचवेळी थंडही होत आहे. यामुळे जमिनीचा उगवनकस नष्ट होत आहे. सध्या तालुक्याचे तापमान हे ४0 अंश सेल्सीअसपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तप्त उन्ह, ढगाळ वातावरण व पाऊस या त्रिकोणी अस्मानी संकटात यंदाचा उन्हाळा ऋतु सापडला आहे. या सर्व परिस्थितीचा मारा शेतकरी झेलत असतानाच हवामान अंदाजानुसार व भविष्यकर्त्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाळा हा कमी तथा मध्यम स्वरुपाचा असल्याच्या बातमीने तर शेतकरी पुरता भांबावला गेला आहे. कधी अतवृष्टी तर कधी अनावृष्टी तर कधी अवेळी पाऊस हा शापच जणू या तालुक्यास पुंजला असल्याचा गतकाळाचा इतिहास आहे. यंदा कमी वृष्टी असल्याने कोरडवाहू तालुक्याचे शेतीचे अर्थकारण बिघडणार असल्याचे दिसत आहे. यंदा पाऊस कमी राहणार असल्याच्या अधिकृत वृत्ताने सध्याच भेदरलेला शेतकर्यांच्या संभाव्य संकटात अधिकच भर पडली आहे. बियाण्यांची यंदा टंचाई भासणार असल्याने कृषी खात्याच्या अंदाजाने तर शेतकर्यांची बियाण्यांसाठी आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे. एकंदर सध्याची परिस्थिती अंदाज यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने शेतकर्यांची योग्य ती व्यवस्था करावी. यंदाचे पर्जन्यमान संमिश्र स्वरुपाचे राहणार असून धनधान्य ही काही प्रमाणात पिकणार आहे. पाण्याची टंचाई काही प्रमाणात जाणवणार आहे. यंदा जूनच्या अखेरीस पाऊस राहणार आहे तर जुलैच्या मध्यापर्यंत समाधानकारक पाऊस राहणार आहे. ऑगस्ट मध्यापर्यंत नैसर्गिक आपत्तीचा काळात ऑगस्ट अखेर कोठे पडेल तर कोठे पडणार नाही असे भाकीत आहे. सप्टेंबरमध्ये पण संमिश्र पाऊसकाळ आहे तर ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.(नगर प्रतिनिधी)