शेतकरी पॅनलचे पुन्हा वर्चस्व
By Admin | Updated: August 25, 2015 00:52 IST2015-08-25T00:52:05+5:302015-08-25T00:52:05+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी पॅनेलने बळीराजा, परिवर्तन पॅनलचा पराभूत करुन पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले आहे.

शेतकरी पॅनलचे पुन्हा वर्चस्व
कृषी उत्पन्न बाजार समिती : बळीराजा, परिवर्तन पॅनलचा धुव्वा
भंडारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी पॅनेलने बळीराजा, परिवर्तन पॅनलचा पराभूत करुन पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २३ आॅगस्ट रोजी घेण्यात आली. यापुर्वी विनोद थानथराटे, भगवान बावनकर, रमा भुरे अविरोध निवडून आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र प्रचार कार्यातून उमटत होते. निवडणूक रिंगणात शेतकरी, परिवर्तन व बळीराजा अशा तीन पॅनल रिंगणात होते. रविवारी शांततामयरित्या निवडणूक पार पडली. आज निकाल घोषित करण्यात आला. यात परिवर्तन पॅनलचा एक उमेदवार वगळता सर्व उमेदवार शेतकरी पॅनलचे निवडून आले.
बळीराजा पॅनलला खातादेखील उघडता येऊ शकले नाही. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मंदा बोंदरे, ललीता राघोर्ते, मधुकर चौधरी, कुसन मडामे, संगीता धुळसे, हर्षिला वैरागडे, प्रविण थुलकर, सुनिल लेंडे, प्रदीप ठवकर, अशोक आकरे, अशोक ईश्वरकर, सखाराम चवळे, रामलाल चौधरी, शालीक भुरे, सोमा राघोर्ते यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनलकडून रामभाऊ कडव निवडून आले. कढव यांनी शेतकरी पॅनलचे रामलाल बोंद्रे यांचा पराभव केला. शेतकरी पॅनलचे नेतृत्व रामलाल चौधरी यांनी केले.
ही निवडणूक चौधरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. निवडणूक निकाल घोषित होताच शेतकरी पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला. शहरातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. (नगर प्रतिनिधी)