कोमेजलेले चेहरे गंभीर वातावरण
By Admin | Updated: May 16, 2014 23:47 IST2014-05-16T23:47:42+5:302014-05-16T23:47:42+5:30
परिवर्तनाची लाट आलेल्या देशात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहर्यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला.

कोमेजलेले चेहरे गंभीर वातावरण
भंडारा : परिवर्तनाची लाट आलेल्या देशात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहर्यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली मतमोजणी दुपारी ४ वाजतापर्यंत सुरूच होती. आठ तासांच्या मतमोजणीच्या कालावधीत पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. कोमेजलेल्या नेत्रबिंदूत धिरगंभीर वातावरण निर्माण होत होते. आता पुढे काय होणार याची शाश्वती चेहर्यावर स्पष्ट झळकत होती. मतमोजणी सुरू असलेल्या स्ट्राँगरुम परिसरात कुणाला किती मते मिळाली याची चुणुकही लागताच धास्तावलेले चेहरे आकडेवारीच्या आवाजाकडे लक्ष द्यायचे. प्रत्येक फेरीत हृदयाचे ठोके वाढत असताना मिळत असलेली उमेदवाराला मते बाहेरील वातावरण तापवत होती. सुरुवातीच्या तीन फेर्यांनंतर वातावरण धिरगंभीर होऊ लागले. सातव्या फेरीत मात्र चेहर्यावरील संयम तुटला. आशेची किरण मावळताना दिसली. दुपारी २ वाजतापर्यंत स्ट्राँगरुम परिसरातील प्रतिनिधी हळूहळू बाहेर निघत होते. विजयी उमेदवाराचा जल्लोष साजरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि साई मंदिर मार्गावर गर्दी जमत होती. घोषणाबाजीमुळे बाहेरील वातावरण विजयाचे तर कोमेजलेल्या चेहर्यांना बघून वातावरण तणावाचे होते. भाजपचे उमेदवार नाना पटोले मोठय़ा मताधिक्याने निवडून आल्याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विजयाची घोषणा होण्यापुर्वीच विजयी मिरवणुक काढण्यात आली. विजयांच्या घोषणाने आसमंत दणाणून गेले. दुसरीकडे पराभूत गटातील सदस्यांच्या चेहर्यावरचा ताण आणि चिंता स्पष्ट दिसत होती. दुरदर्शनच्या माध्यमातून देशभरात भाजपची लाट दिसत असताना भंडार्यातही तशीच स्थिती राहणार काय? या विवंचनेत पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत होते. दुपारनंतर मात्र रस्त्यावर फक्त विजयी उमेदवारांची गर्दी दिसत होती. नारेबाजीत मोदींचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी जिल्हा मुख्य निवडणुक अधिकार्यांकडून नाना पटोले यांनी जेव्हा प्रमाणपत्र स्विकारले तेव्हा फक्त अन् फक्त भाजप गटाचेच प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. पराभुताची कारणे शोधण्याची वेळ आता येणार आहेत, असेही चित्र पाहावयास मिळाले. ‘कही खुशीच खुशी तर कुठे फक्त गम’ असाच काहीसा प्रत्यय आज दिवसभराच्या हालचालीनंतर आला.