बनावट प्रमाणपत्र, महिलेला एक वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: April 28, 2015 00:36 IST2015-04-28T00:36:07+5:302015-04-28T00:36:07+5:30
कायदेशीर वारसान प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तलाठ्याच्या हस्ताक्षराचा उपयोग करुन बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले.

बनावट प्रमाणपत्र, महिलेला एक वर्षाची शिक्षा
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : वारसान प्रमाणपत्रासाठी तलाठ्याच्या बनावट स्वाक्षरीचे प्रमाणपत्र केले होते सादर
भंडारा : कायदेशीर वारसान प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तलाठ्याच्या हस्ताक्षराचा उपयोग करुन बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर ते प्रमाणपत्र तहसील कार्यालयात सादर केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपी महिलेला दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी न्या. एम. एस. लोणे यांच्या न्यायालयाने आरोपी सुशीला तांडेकर (७२) यांना भादंवि ४२० कलमान्वये एक वर्ष साधारण कारावास आणि कलम ४६५ आणि ४७१ कलमान्वये सहा-सहा महिने साधारण कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तिन्ही कलमान्वये २००-२०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली जाणार आहे.
याप्रकरणात एकूण दोन आरोपींपैकी राजू बनसोड (३९) यांना न्यायालयाने दोषमुक्त केले.
येथील गांधी वॉर्डातील रहिवाशी सुशीला तांडेकर यांनी २० मे २००९ रोजी ‘कुटुंब विवरण प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी भंडारा तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर १२ जून २००९ च्या सायंकाळी चार वाजता तलाठी रामू नेवारे हे कार्यालयीन कामासाठी नझुल विभागात पोहोचले असता त्यांना या कामाकाजाशी संबंधित लिपीक रमेश फाले यांनी तांडेकर यांचा अर्ज दाखविला. ज्यात तलाठी रामू नेवारे यांच्या हस्ताक्षरातील बनावट प्रमाणपत्र जोडून होता. या प्रकारामुळे अचंबित झालेले तलाठी नेवारे यांनी त्या प्रमाणपत्राची तपासणी केली असता त्यात लिहिलेले हस्ताक्षर बनावट असल्याचे आढळून आले. त्यावरील शिक्केसुद्धा तलाठी कार्यालयातील शिक्क्यांपेक्षा वेगळे होते. त्यानंतर हे दस्तावेज पूर्णत: बनावट असल्याच्या निष्कर्षाप्रत नेवारे पोहोचले. त्यानंतर त्यांनी याची माहिती तत्कालीन तहसीलदार अशोक शिवरकर यांना दिली. त्यानंतर तहसीलदार शिवरकर यांनी पोलिसांत तक्रार केली. तहसीलदारांकडून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर भंडारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक ए. जी. दोनाडकर यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर उपनिरीक्षक ए. के. राऊत यांनी तपास केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना या बनावट प्रमाणपत्रावर लिहिलेली अक्षरे राजू बनसोड यांची असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपींनी लिहीलेले अक्षरे आणि तलाठी रामू नेवारे यांच्या अक्षरांचे नमूने तपासण्यात आले. त्यानंतर हस्ताक्षर विशेषज्ञांकडून अभिप्राय मागविण्यात आले. प्रमाणपत्रावर मारलेले शिक्के आणि तलाठी कार्यालयातील शिक्के तपासण्यात आल्यानंतर ३१ डिसेंबर २००९ रोजी जिल्हा न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. याप्रकरणात सरकारी पक्षाकडून एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. हे प्रकरण पाच वर्ष तीन महिने २२ दिवस चालले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एम. एस. लोणे यांनी २२ एप्रिलला निकाल दिला. या प्रकरणात सरकारकडून सहायक सरकारी वकील व्ही. एस. तामगाडगे यांनी तर बचाव पक्षाकडून अॅड.एन. एस. तलमले व अॅड.के. एस. भुरे यांनी युक्तीवाद केला. (जिल्हा प्रतिनिधी)