प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:24 IST2016-07-31T00:24:20+5:302016-07-31T00:24:20+5:30
प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणारी योजना असून या योजनेला २ आॅगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ
२ आॅगस्टपर्यंत संधी : शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
भंडारा : प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणारी योजना असून या योजनेला २ आॅगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, किड व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार असल्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नलिनी भोयर यांनी केले आहे.
या योजनेत पिकाच्या नुकसानीचे अत्यंत परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहणार आहे. पिक कर्ज घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी आॅगस्ट २०१६ अखेर कर्ज घेतले असल्यास विमा प्रिमीयम रक्कम कपात करण्यात येवून सदर योजनेचा लाभ घेता येईल.
शेतकऱ्यांनी २ आॅगस्टअखेर कर्ज घेण्याची कायर्वाही करावी. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सुध्दा २ आॅगस्टपर्यंत पिक विमा काढून घेण्याची कार्यवाही करावी. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के व रब्बी हंगामाकरीता १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित आहे आणि जोखीमस्तर सर्व पिकासाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.
पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकाच्या उत्पन्नात घट आल्यास विमा संरक्षण प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे व पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान काढणी पश्चात नुकसान यास विमा संरक्षण मिळेल.
जिल्ह्याकरीता भात व सोयाबिन या २ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भात पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ३९ हजार प्रति हेक्टरी व सोयाबिनसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी असून शेतकऱ्यांना भात पिकाकरीता भरावयाचा पिक विमा हप्ता ७८० रुपये प्रति हेक्टरी तसेच सोयाबिनसाठी ७२० रुपये प्रति हेक्टरी भरावयाचे आहेत.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्तावाचे आवेदन पत्र भरुन बँकेच्या स्थानिक, प्रादेशिक, प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था, विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रकमेसह भरावे, असे म्हटले आहे.
या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीनंतर शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याबाबतची माहिती ४८ तासाच्या आत संबंधित बँक, वित्तीय संस्था, विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे. बिगर कजर्दार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठी एका क्षेत्रासाठी, एकाचवेळी आणि एकाच विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)