अखेर ‘त्या’ मार्गावर कंत्राटदाराने पसरविली गिट्टी
By Admin | Updated: June 27, 2017 00:32 IST2017-06-27T00:32:13+5:302017-06-27T00:32:13+5:30
गणेशपूर ते कोरंभी या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर वैनगंगा नदीपात्रात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा व्हावी ....

अखेर ‘त्या’ मार्गावर कंत्राटदाराने पसरविली गिट्टी
प्रकरण गणेशपूर - कोरंभी मार्गाचे : जया सोनकुसरे यांनी दिले होते अल्टीमेटम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गणेशपूर ते कोरंभी या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर वैनगंगा नदीपात्रात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा व्हावी याकरिता पर्यायी रस्ता कंत्राटदाराने बनवावे असे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदाराने रस्त्याकरिता केवळ माती टाकली होती. पाऊस पडल्याने हा रस्ता रहदारीयोग्य न झाल्याने वाहनधारक येथून जाताना पडल्याने जखमी झाले होते. याबाबत शिवसेनेने दिलेल्या २४ तासाच्या अल्टीमेटम नंतर या मार्गावर गिट्टी पसरविण्यात आली.
गणेशपूर येथून पिंडकेपार - कोरंभी, सालेबर्डी, खैरी, कवडसी, सावली, पिपरी यासह पुढील गावांना जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. वैनगंगा नदीपात्रात जुना पुल आहे. मात्र त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग अनेकदा बंद राहतो. त्यासह गोसेखुर्द धरणाच्या जलसंचयामुळेही येथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होता. ही बाब लक्षात घेऊन गोसेखुर्द पुनर्वसन प्रकल्प कार्यालयाने या मार्गावर सुमारे तीन कोटी रुपयांचा पुल मंजूर केला व त्याचे काम सध्या सुरु आहे.
१८ महिने लोटूनही पुलाचे काम सुरुच असल्याने या प्रकारात संथगती सुरु असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी लावला होता. दरम्यान हा मुद्दा त्यांनी जिल्हा परिषद सभागृहातही उपस्थित केला होता. वेळेत पुलाचे काम होणे गरजेचे असताना उन्हाळ्यात काम न करता आता पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे काम व रस्त्याचे काम पूर्ववत सुरु केलेले आहे. दरम्यान कंत्राटदाराने येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी थातूरमातूर काम करताना माती टाकली. दरम्यान पावसामुळे माती ओली झाली व येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारक, सायकलचालक व पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. अनेकजण येथून जाताना पडल्याने जखमी झाले.
ही बाब उचलून जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी सदर कंत्राटदाराला नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा देण्याची मागणी केली. २४ तासात ती पूर्ण न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. जया सोनकुसरे यांनी दिलेल्या इशाऱ्याची कंत्राटदार व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दाखल घेतली.
त्यांनी या पर्यायी रस्त्यावर टाकलेल्या मातीवर ताबडतोब गिट्टी पसरविली असून नागरिकांसाठी आता सुविधायुक्त रस्ता झालेला आहे. यावरून कंत्राटदाराचा मनमानी कारभार दिसून आला.