लक्षावधी खर्चूनही नाल्यांत कचरा तुंबलेलाच
By Admin | Updated: July 21, 2015 00:38 IST2015-07-21T00:38:27+5:302015-07-21T00:38:27+5:30
दिवसेंगणीक भंडारा शहराची व्याप्ती वाढत असताना स्वच्छतेच्या मुद्यावर मात्र भंडारा नगरपालिका प्रशासन सपेशल फेल ठरली

लक्षावधी खर्चूनही नाल्यांत कचरा तुंबलेलाच
नाल्या झाल्या चोक : डासांमुळे नागरिक झाले त्रस्त
भंडारा : दिवसेंगणीक भंडारा शहराची व्याप्ती वाढत असताना स्वच्छतेच्या मुद्यावर मात्र भंडारा नगरपालिका प्रशासन सपेशल फेल ठरली आहे. विशेष म्हणजे स्वच्छते बाबतीत जेवढी जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी नागरिकांची आहे. या दोघांचा बेजबाबदारपणामुळे भंडारा शहराचा चेहरामोहरा घाणयुक्त बनला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी पालिका प्रशासनाकरवी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. परंतु लक्षावधी रुपयांचा खर्च होऊनही स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. यावर्षीही नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागातर्फे मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात २५ पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने कचऱ्याची उचल करण्यात आली.
तुंबलेल्या नाल्यांमधील कचरा उपसण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. असे नाही की, नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला नाही. मात्र सर्वच ठिकाणी शंभर टक्के काम झालेले नाही. जवळपास १० लाखांपेक्षा निधी स्वच्छता मोहीमेवर खर्च झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वॉर्डामध्ये स्वच्छतेचे काम आजही सुरुच आहे. दरवर्षी लक्षावधी रुपयांचा खर्च करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असेल तर येवढा निधी खर्चून उपयोग काय? असा खरा सवाल सर्वांसमोर उपस्थित होतो. (प्रतिनिधी)
पावसाळ्याच्या तोंडावर सफाई कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला आाहे. ज्या ठिकाणी जास्त गरज आहे त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येते. विशेष म्हणजे स्वच्छतेच्या कामात नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे.
- रवंींद्र देवतळे,
मुख्याधिकारी, भंडारा.