कोट्यवधीचा खर्च तरीही पेयजल योजना अपूर्णच
By Admin | Updated: March 30, 2015 00:45 IST2015-03-30T00:45:31+5:302015-03-30T00:45:31+5:30
तालुक्यात मागील वर्षांपासून पेयजल योजनांवर कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला.

कोट्यवधीचा खर्च तरीही पेयजल योजना अपूर्णच
कोरपना: तालुक्यात मागील वर्षांपासून पेयजल योजनांवर कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. मात्र आजघडीला एकही योजना खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेली नाही. काही योजना थातूर-मातूर पूर्ण दाखवून हस्तांतरीत करण्यात आल्या. मात्र त्यातून पाणी पूरवठा होतच नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
१९९८ ला कोरपना तालुक्यातील गाडेगाव (विरुर) कोठोडा, सोनुर्ली, निमनी, आवारपूर व कोडशी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. या योजनांमध्ये तालुक्यातील तब्बल ५३ पेक्षा अधिक गावांचा समावेश होता. २००६ पर्यंत या सर्व योजनांवर कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. या आठ वर्षात प्रचंड खर्च करूनही एकही योजना कार्यान्वित झाली नाही. त्यानंतर २००७ ते २०१४ या सात वर्षात देखरेख, दुरुस्तीकरिता सुधारित अंदाजपत्रक तयार करुन पुन्हा निधी जिरवण्यात आला. मात्र अद्यापही योजना सुरु झाल्या नाहीत. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि गाव पातळीवरील पाणी पुरवठा समितीच्या ढिसाळ वृत्तीमुळे या योजना रेंगाळल्या अवस्थेत आहे. गाव पातळीवरील समित्यांना प्रशिक्षणाचा अभाव तसेच संबंधित खात्याचे अधिकारी व कंत्राटदारांच्या हाती आर्थिक व्यवहार असल्याने समिती केवळ स्वाक्षऱ्यापूरतीच मर्यादित झाली आहे.
१९९७-९८ मध्ये सोनुर्ली (वनसडी) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पिपर्डा येथे जलकुंभ उभारण्यात आले. जलवाहिन्याही टाकण्यात आल्या. मात्र २०१२ पर्यंत पाणीच मिळाले नाही. २०१२-१३ मध्ये ३२ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर काम सुरु झाले. येथील पाणी पुरवठा समिती स्थापन केल्यापासून हे काम पूर्ण होईपर्यंत एकदाही गाव पातळीवर समितीची बैठकच घेण्यात आली नाही. दरम्यान, २२ आॅगस्ट २०१४ च्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत या योजनेवरील खर्चाची माहिती मागण्यात आली. सात महिणे लोटूनही सदर माहिती अद्यापही पूरविण्यात आली नसल्याचे सैय्यद आबिदअली यांनी सांगितले.
तालुक्यात १९९८ मध्ये मंजूर झालेल्या बहुतेक पाणी पुरवठा योजनांचे जलकुंभ पूर्ण झाले. मात्र सदोष जलवाहिण्यांमुळे पाणी पुढे सरकतच नाही. खिरडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीसाठी १५ लाख मंजूर झाले. त्यापैकी ४ लाख खर्चही झाले. मात्र पाच वर्षांपासून काम अपूर्णच आहे. पिपर्डा येथील पुरवठ्यावर ३० लाख खर्च झाले. येथे टाकण्यात आलेल्या जलवाहीण्या जागोजागी लिकेज असल्याने ग्रामसभेने मंजूरीच दिली नाही. पिपरी (नारंडा) येथील योजनेचा बट्ट्याबोळ झाला. २०१२ मध्ये पुन्हा नव्याने ३२ लाख ७४ हजाराची योजना मंजूर झाली. हे काम संथगतीने सुरु आहे. वनसडी येथे २०११ मध्ये ५० लाख ७४ हजार रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. आजवर २९ लाखाचा खर्च दाखवण्यात आला. भौतिकदृष्ट्या काम प्रगतीवर दाखविले असून चार वर्षात हे काम अपूर्णच अवस्थेत आहे.
तालुक्यात पेयजलावर झालेला प्रचंड खर्च पाहता किमान १०० गावे विहिरी आणि कुपनलिका मुक्त व्हायला पाहिजे होते. प्रत्यक्षात सदर गावे तहानलेली आहेत.
शासनाने मांगलहिरा, थिप्पा, बोरगाव, धानोली, कोडशी (बु.) कोडशी (खु) आणि कातलाबोडी ही तालुक्यातील गावे जलस्वराज टप्पाट- एक आणि टप्पा दोनमध्ये निवडली होती. त्याअंतर्गत कामेही करण्यात आली असे असताना याच गावांना नव्याने राजीव गांधी पेयजल योजना खनिज विकास निधी, स्थानिक विकास निधी, आदिवासी उपयोजना, जिल्हा नियोजन विकास निधी अशा निधीतून एकाच गावाचा तीन-चार योजनेत समावेश करुनही काम पूर्णत्वास गेले नसल्याने या गावातील जलसंकट संपले नाही.
जलस्वराज अंतर्गत कुकूडबोडी, भरकीगुडा आणि हातलोणी येथे लक्षावधीचा खर्च करुनही ही गावे तहानलेलीच आहेत. केवळ कागदोपत्री योजना पूर्णत्वास झाल्याचे दाखवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत
कोरपना तालुक्यात विविध पेयजल योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे निधी जिरवण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सैय्यद आबिद अली यांनी केला आहे. तालुक्यात तीन-चार कंत्राटदारांची मक्तेदारी असून गेल्या १७-१८ वर्षांपासून नव्या कंत्रादारांना कामच दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.