मुख्य मार्गावरील अतिक्रमण भुईसपाट

By Admin | Updated: December 31, 2016 01:43 IST2016-12-31T01:43:55+5:302016-12-31T01:43:55+5:30

मागील तीन दिवसांपासून भंडारा शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे.

Encroachment on the main road ground floor | मुख्य मार्गावरील अतिक्रमण भुईसपाट

मुख्य मार्गावरील अतिक्रमण भुईसपाट

तिसऱ्या दिवशीही मोहीम सुरुच
विजेचे खांब काढण्याची गरज
मागील तीन दिवसांपासून भंडारा शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. अतिक्रमण काढल्यामुळे चौक प्रशस्त झाले आहे. पर्यायाने चौकांचे सौदर्य खुलून दिसत आहे. परंतु शहरातील चौकाचौकात रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब आहेत. त्यामुळे रस्ता रूंद झाला असला तरी हे खांब व्यत्यय ठरत आहे. यासोबतच अनेकांनी आपल्या दुकानासमोरचे आणि घरासमोरचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये, यासाठी झाडे लावून ठेवली आहे. आता अतिक्रमण काढल्यामुळे ही झाडे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण करणारे झाडे तोडण्याची गरज आहे.

भंडारा : जिल्हा प्रशासन नगर पालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी अतिक्रमण मोहिम आज तिसऱ्या दिवशीही जोमात चालली. सकाळी १० वाजतापासून बसस्थानकापासून सुरु झालेली ही मोहीम सायंकाळी गांधीचौकापर्यंत पोहोचली. यात मोठा बाजार परिसरासह मुख्य मार्गावरील अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले.
दर तीन वर्षांनी अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत असली तरी त्यात भविष्यकालीन नियोजन व अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा पुन्हा आज शहरात ऐकावयास मिळत होती. अतिक्रमण काढले जात असले तरी अतिक्रमण निर्मुलनानंतर साचलेले मातीचे ढिगारे, उरलेल्या दुकानांचे अवशेष तिथेच पडक्या अवस्थेत दिसून येत आहेत. नगर पालिका प्रशासनाच्या ट्रॅक्टरद्वारे फक्त अतिक्रमीत साहित्याची उचल करण्यात येत आहे. मलबा तसाच पडून असल्याने समस्येत अजून भर होत आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
अतिक्रमणावर बुलडोजर चालत असल्याचे पाहून असंख्य दुकानदारांनी स्वत:च अतिक्रमण काढण्यावर भर दिला.
पोस्ट आॅफीस चौक, आठवडी बाजार परिसर, गभणे चौरस्ता, कमला हाऊस परिसर, तुकडोजी महाराज परिसर यासह गांधी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. असंख्य दुकानांच्या पायऱ्या अतिक्रमणात येत असल्याने त्या तोडण्यात आल्या. या पायऱ्या तोडत असताना दरवर्षी हेच बांधकाम करावे काय असा संतप्त सवालही दुकानदार बोलून दाखवित होते.
रविवारी आठवडी बाजार असल्याने बाजारपेठेत होणारी उलाढाल पाहता अतिक्रमण पुन्हा जैसे थे होणार काय याचीही भिती सतावू लागली आहे. दुसरीकडे दोन दिवसांपासून अतिक्रमणावर बुलडोजर चालत असल्याने वाहतूक उलाढालीवर मोठा परिणाम पडला आहे. यासंदर्भात नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांना विचारले असता, संपूर्ण अतिक्रमण कारवाई केल्यानंतरच किती अतिक्रमणे काढण्यात आली, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment on the main road ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.