शाळांच्या रिकाम्या खोल्या बनणार गोदाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:09+5:302021-06-09T04:44:09+5:30

मोहाडी - शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागील वर्षीपासून घरीच आहेत. त्यामुळे शाळेतील रिकाम्या खोल्यांवर प्रशासनाची नजर गेली अन ...

The empty school rooms will become warehouses | शाळांच्या रिकाम्या खोल्या बनणार गोदाम

शाळांच्या रिकाम्या खोल्या बनणार गोदाम

मोहाडी - शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागील वर्षीपासून घरीच आहेत. त्यामुळे शाळेतील रिकाम्या खोल्यांवर प्रशासनाची नजर गेली अन आता जिल्हा परिषदेच्या शाळा धान्याची कोठार बनणार आहेत. मागील वर्षी कोविड-१९ या विषाणूने जगभरात पाऊल टाकले. त्यामुळे सामान्य परिस्थिती प्रभावित झाली. मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत. यावर्षीच्या कोविड-१९ च्या विषाणूने भयावह परिस्थिती निर्माण केली होती. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक हादरून गेले होते. सध्या परिस्थिती सुधारली आहे. कोविड-१९ ची तिसरी लाट येण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यानंतर कधी शाळांच्या खोल्या विद्यार्थ्यांनी गजबजतील याची साशंकता आहे. परिणामी काही दिवस तरी शाळांच्या खोल्या रिकाम्या राहणार आहेत. या रिकाम्या शाळांच्या खोल्यांत आता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्या धान्याची गोदामे बनणार आहेत. याबाबत १ जून रोजी शिक्षण विभागाला पत्र दिले. त्या पत्रानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद माध्यमिक शाळांच्या इमारती आपणास सन २०२०-२१ या कालावधीसाठी धान खरेदीकरिता पर्यायी गोदामांची व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा अटी व शर्तीच्या अधिन राहून उपलब्ध करुन देण्यात येणार असे जिल्हा पणन अधिकाऱ्यांना २ जून रोजीच्या पत्रात कळविले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रिकाम्या खोल्या देताना काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. शाळेच्या इमारतीची कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. शाळेतील डेस्क-बेंच तसेच इतर साहित्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. शाळेची इमारत/डेस्क-बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. शाळेचे विद्युत देयक अदा करावे लागेल. इतर अनुषंगिक बाबीकरिता जबाबदारी राहील. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरु करण्यात आल्यास तत्काळ शाळा इमारत रिकामी व स्वच्छ करुन देण्याची जबाबदारी आपली राहील अशा अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. या अटीवरच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रिकाम्या खोल्या देण्याचे निर्देश जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील किती शाळा आधारभूत धान साठवणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: The empty school rooms will become warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.