रोजगार हमी योजनेचा बट्ट्याबोळ
By Admin | Updated: September 2, 2016 00:40 IST2016-09-02T00:40:24+5:302016-09-02T00:40:24+5:30
लाखनी तालुक्याच्या विकासाला ग्रहण लागले आहे. सामान्य माणूस विकासाच्या कोसो दूर जात असून अधिकारी - कर्मचारी

रोजगार हमी योजनेचा बट्ट्याबोळ
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संगनमत : २०१४ पासून मजुरी थकीत
पालांदूर : लाखनी तालुक्याच्या विकासाला ग्रहण लागले आहे. सामान्य माणूस विकासाच्या कोसो दूर जात असून अधिकारी - कर्मचारी आपल्याच तोऱ्यात काम करीत आहेत. लोकप्रतिनिधींचा धाक नसल्याने त्यांचे फावले आहे. पंचायत समितीत सामान्य मजुराला वारंवार हेलपाट्या मारूनही तीन वर्षापासून मजुरीच मिळत नसेल तर कल्पना करा अधिकारी कसे काम करीत असतेल, हे सहज कळते.
लाखनी तालुक्याला खमक्या लोकप्रतिनिधींची उणिव भासत आहे. लोकप्रतिनिधींचा धाक पदाधिकाऱ्यांना नसल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी कंत्राटदाराच्या भूमिकेत सत्ता भोगत असल्याने मिलबाटके खाण्याची सवय रूढ झाली आहे.
खुनारी येथील चार मजुरांचे २०१४ पासूनचे पैसेच मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. यात विणा निंबार्ते ८ हप्ते, वैशाली बागडे ८ हप्ते, कमला खराबे ४ हप्ते, कुंदा कुर्झेकर ४ हप्ते थकीत आहेत. तीन वर्षात कित्येकदा बँक पासबुक, आधार पुरवूनही संगणक चालक तारखांवर तारीख (वेळ मारून नेणे) सुरु आहे.
पालांदूरातही याच्यापेक्षा मोठी अफरातफर १५ आॅगस्टच्या आमसभेत पुढे आली आहे. एकाच्या खात्याचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर काम न करणाऱ्याही पैसे तर नियमित काम करूनही वर्ष, दोन वर्षे लोटूनही पैसे मिळाले नाही.
अख्खा तालुका पंचायत समितीच्या कामावर जाम नाखूश आहे. ग्रामपंचायतच्या क्षेत्रात पारदर्शकता नाही. मनरेगा व्यवस्थित नाही म्हणजे नेमके पंचायत समितीत भोंगळ कारभाराला खतपाणी घालतो कोण? हे अनुत्तरीत आहे. (वार्ताहर)
लाखनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागही काही चांगले संबंधित अभियंता कामावर प्रत्यक्ष हजर राहतच नाही. काम ग्रामपंचायतच्या नावावर पण प्रत्यक्ष काम वेगळाच कंत्राटदार नियम पायदळी तुडवून स्वमर्जीने काम सुरु आहे. लोकप्रतिनिधीच कंत्राटदाराच्या भूमिकेत काम करीत असल्याने कामाचा दर्जा अपेक्षित नाही. पंचायत समिती लाखनीच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे ३ वर्षात यांना जागवूनही जाग आलेली नाही. संगणक चालकाला पुढे करून अधिकारी वेगळ मारून नेत आहेत. हे लोकशाहीच्या विकासाला मोठे ग्रहण आहे. सामान्य माणसांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना गावबंदीकरीत हक्कासाठी रस्त्यावर येण्याची गरज निर्माण झाली आहे.
-हेमंतुकमार सेलोकर, सरपंच, खुनारी