कर्मचाऱ्यांनी केला घटनेचा निषेध
By Admin | Updated: August 26, 2015 00:22 IST2015-08-26T00:22:10+5:302015-08-26T00:22:10+5:30
भंडारा न.प. आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला माजी नगराध्यक्षानी मारहाण करुन खोट्या आरोपाखाली पोलिसांत गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ ...

कर्मचाऱ्यांनी केला घटनेचा निषेध
तुमसर : भंडारा न.प. आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला माजी नगराध्यक्षानी मारहाण करुन खोट्या आरोपाखाली पोलिसांत गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ तुमसर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज २५ आॅगस्ट मंगळवारला नगर परिषदेसमोर काळ््या फिती बांधून निदर्शने केली.
१९ आॅगस्टला नगर परिषदचे कर्मचारी अतिक्रमण काढण्याकरिता गेले असता अतिक्रमण काढून टाकल्याने माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी २१ आॅगस्टला रोषात येऊन आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी किशोर उपरीकर यांना मारहाण केली. याउपर कर्मचाऱ्यावर विनयभंग केल्याची खोटी तक्रारही दाखल केली, परंतु पोलिसांनी मात्र कर्मचाऱ्याला मारहाणीचा गुन्हा दाखल करुनही अद्यापही अटक न केल्याने नगर परिषद कर्मचाऱ्यात रोष निर्माण झाला असून दोन दिवसात मारहाण करणाऱ्या माजी नगराध्यक्षाना अटक न केल्यास तसेच कर्मचारी उपरीकरवर लावलेले गुन्हे खारीज न केल्यास महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल. पुर्व सुचना म्हणून त्या घटनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे सैयद नासीर अली, अशोक कनोजे, सुनील लांजेवार, वहीद खान पठाण, सुरेश पोटभरे, सुरेंद्र वाहने, प्रवीण बोरकर, जमिल शेख, राधेशाम लांजेवार, गणेश मेहर, गणेश बालपांडे, सचिन ढबाले, मोहन बोरघरे, संजय साठवणे, कैलाश वर्मा, देवेंद्र शेबुर्णीकर, मोरेश्वर कापसे, मनोहर मेश्राम व इतर कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आंदोलनात मध्यस्थी करा
भंडारा : शहरातील स्वच्छतेचा, पिण्याच्या पाण्याचा, दिवाबत्ती अशा विविध मूलभूत गरजांची पालनकर्ती असलेल्या भंडारा नगर परिषदेतील कर्मचारी मागील चार दिवसांपासून माजी नगराध्यक्षासोबत झालेल्या भांडणामुळे काम बंद आंदोलन करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण भंडारा शहरात अस्वच्छतेचे वातावरण तयार झालेले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयाचे पालक या नात्याने सदर तंट्यात मध्यस्थी करुन हे भांडण त्वरित मिटविण्याची मागणी शिवसेनेचे संजय रेहपाडे यांनी केली आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरात दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. त्यामुळे डेंग्यू, कॉलरासारखे आजार शहरात बळावले आहेत. मात्र न.प.चे अधिकारी, पदाधिकारी नागनदीकडे बोट दाखवून जवाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत, परंतु वस्तुस्थिती ही नक्कीच नाही. नगर परिषद ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ ठरु पाहत आहे. त्यातल्या त्यात मागील चार दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना नगर परिषद कार्यालयाकडून मिळणाऱ्या दाखल्यांना विलंब होत असल्याने याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे शासकीय कामे प्रलंबित होत आहेत.