कृषीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत होणार

By Admin | Updated: May 11, 2017 00:22 IST2017-05-11T00:22:00+5:302017-05-11T00:22:00+5:30

जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे हाती आलेले पीक थोड्याशा पाण्याअभावी हातचे जाण्याची शक्यता बळावली आहे.

The electricity supply of agriculture plants will be restored | कृषीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत होणार

कृषीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत होणार

आदेश निर्गमित : नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे हाती आलेले पीक थोड्याशा पाण्याअभावी हातचे जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चित्रे दिसून येत होती. त्यामुळे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची समस्या मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांसाठी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश महावितरणला दिले.
शेतपिकासाठी पाण्याची आवश्यकता असताना शेतातील विहिरीत पाणी असूनही भारनियमनामुळे पाणी पिकांना देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली होती. त्यामुळे भारनियमन कमी करण्यासाठी जिल्ह्यात आंदोलने झाली. काही ठिकाणी १६ तासांचे तर काही ठिकाणी १२ तासांचे भारनियमन सुरू होते.
अखेर पाण्याअभावी पीक शेतकऱ्यांच्या हातून जाऊ शकते. त्यामुळे शेतकरी संकटात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन खासदार नाना पटोले यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नाना पटोले यांनी पिकाची अवस्था व शेतकऱ्यांची दैनावस्थेची भीषणता मुख्यमंत्र्यांसमोर विषद केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांसाठी मागील काळापासून सुरू असलेले भारनियमन बंद करावे, शेतीसाठी पूर्ववत वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश महावितरणला दिलेत. आता शेतीसाठी वीजपुरवठा पूर्ववत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भारनियमनातून दिलासा मिळाला आहे.

Web Title: The electricity supply of agriculture plants will be restored