आठ प्रकल्प तुडूंब
By Admin | Updated: August 6, 2014 23:40 IST2014-08-06T23:40:22+5:302014-08-06T23:40:22+5:30
जिल्ह्यासह मध्य प्रदेशात बरसत असलेल्या संततधार पावसामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४९ टक्के जलसाठा असून यापैकी चार माजी मालगुजारी तलाव,

आठ प्रकल्प तुडूंब
भंडारा : जिल्ह्यासह मध्य प्रदेशात बरसत असलेल्या संततधार पावसामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४९ टक्के जलसाठा असून यापैकी चार माजी मालगुजारी तलाव, एक मध्यम प्रकल्प तर ४ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मध्यम प्रकल्पात पाण्याची सरासरी टक्केवारी ४१.२६ आहे.
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा दिवसेंगणिक वाढत आहे़ जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत सरासरी ४९ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३७ टक्क्यांनी घट असल्याचे दिसून येते. मागील वर्षी याच दिवशी ही टक्केवारी ८६.९२ इतकी होती.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २६.०९, बघेडा १००, बेटेकर बोथली ६६.२३ आणि सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा ५५.२५ टक्के आहे़
३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ५०.५१ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ५८.०९ टक्के आहे़
३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. आमगाव, पाथरी, लवारी, सितेपार हे मालगुजारी तलाव शंभर टक्के भरले आहेत. तसेच वाकल, परसवाडा, डोंगरला, नागठाणा, टांगा हे लघल प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला होता. सध्या जिल्हा प्रशासनाने काल ढगफुटीच्या संभाव्य धोक्यामुळे नदीकाठावरील गावांना धोक्याची पूर्वसूचना दिली होती.