खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरातीलच बियाणाचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST2021-06-06T04:26:47+5:302021-06-06T04:26:47+5:30

भंडारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन भंडारा ...

During kharif season, farmers should use home grown seeds | खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरातीलच बियाणाचा वापर करावा

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घरातीलच बियाणाचा वापर करावा

भंडारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सद्य:स्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाण्यांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे सांगितले. कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेले सोयाबीन यावर्षी पेरणीसाठी वापरू शकतात. प्रमाणित बियाणाच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. मात्र, हे करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घ्यावी. बियाणाची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी. तसेच दरवर्षी बियाणाची घरीच साठवणूक करताना प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा, त्याऐवजी गोणपाटाची पोती वापरणे आवश्यक आहे. घरच्याच बियाणाची उगवणशक्ती तपासण्याचे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

बॉक्स

उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असावी

शेतकऱ्यांनी आपल्या घरातील बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी बियाणाची उगवण क्षमता तपासावी. सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ते बियाणे पेरणीयोग्य असते. याशिवाय ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास सोयाबीनची पेरणी करावी. ही पेरणी करताना दोन ते चार सेंटिमीटर खोलीपर्यंत बियाणे जाईल, याची काळजी घ्यावी. पेरणी अगोदर प्रतिकिलो बियाणाला तीन ग्रॅमची दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाणास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून ते सावलीत वाळवावे. नंतरच त्याची पेरणी करावी. बियाणे हाताळताना बियाण्याची जास्त आदळआपट न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने लागवड करावी.

Web Title: During kharif season, farmers should use home grown seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.