दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात
By Admin | Updated: January 13, 2015 22:54 IST2015-01-13T22:54:38+5:302015-01-13T22:54:38+5:30
संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा दरवर्षी मकरसंक्रांतीला भरत असून तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत दरवर्षी

दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात
संजय साठवणे - साकोली
संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा दरवर्षी मकरसंक्रांतीला भरत असून तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत दरवर्षी लाखो भाविक दर्शनाकरिता येतात. या यात्रेला प्रशासन व मंदिर कमेटी सज्ज असून आज सकाळी येथील डोहात भाविक आंघोळ करून विधिवत पूजापाठ करणार आहेत.
दरवर्षी मकरसंक्रांतीला म्हणजे दि. १४ जानेवारीला भरत असलेली ही यात्रा तीन दिवस भरते. मकरसंक्रांतीचा दिवस प्रयाग स्नानारंभ असल्याने भाविक मोठ्या आस्थेने आंघोळ करून पूजाअर्चा करतात. या यात्रेदरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवल्या जातो. तर संबंधित विभागाकडून पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य शिबिर, मोफत औषध वाटप यासारख्या विविध सोयीसुविधा शासनातर्फे भाविकांना पुरविल्या जातात.
मंदिराचा जीर्णोद्धार
दुर्गाबाईचा मंदिर हे फार वर्षापूर्वीचे बांधलेले होते. कालांतराने हे मंदिर जीर्ण झाले. चार वर्षापूर्वी खा.नाना पटोले यांनी पर्यटन विकास निधीतून या मंदिराचे जीर्णोद्धार केले. मात्र नवीन मंदिर तयार करताना मूर्ती जुन्याच जागी ठेवण्यात आल्या.
त्यांना हलविण्यात आले नाही हे विशेष.
जादा बसेसची सोय
दुर्गाबाई डोह यात्रा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असल्याने या यात्रेला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यातून भाविक येतात. त्यामुळे साकोली आगारातून यात्रेसाठी जादा बसेसची सोय दरवर्षी करण्यात येते.
घोडाबाजार आकर्षण
पुरातन काळापासून सुरु असलेल्या या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात्रेत घोड्यांचा बाजार भरतो. या बाजारात घोड्यांची खरेदी विक्री केली जाते. हे यात्रेचे आणखी एक आकर्षण आहे.
बॅनर युद्ध
यात्रेत लाखो भाविक येत असल्यामुळे या यात्रेत विविध पक्षाच्या नेत्यांचे भाविकांना शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर लावले असतात.
पाहुण्यांची रेलचेल
धर्मापुरी व कुंभली या दोन्ही गावात यात्रेदरम्यान घरोघरी पाहुण्यांची गर्दी असते. तर गावकरी मनोरंजनासाठी दरवर्षी नाटकाचे आयोजन करतात.
गृहोपयोगी वस्तूंची विक्री
पारंपारिक व हस्तकलेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री या यात्रेतून मोठ्या प्रमाणात होते. यात्रेदरम्यान दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
यात्रेची आख्यायिका
काही वर्षापूर्वी कुंभली धर्मापुरी गावाला लागूनच असलेल्या गावाबाहेर टेकडीवर गवळी जमात वास्तव्य करीत होती. शेती व गुरे पाळणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.
शेतीला मुबलक पाणी पुरवठा व्हावा, या हेतूने लागूनच असलेल्या चुलबंद नदीवर बांध घालण्यासाठी या जमातीमधील प्रमुख कुटुंबे समोर आली. त्या कुटुंबातील सात भाऊ व एक बहिण असे आठ जण हा डोह बघताना गतप्राण झाले अशी आख्यायिका आहे.