मान्सून लांबल्याने बळीराजा चिंतातूर
By Admin | Updated: June 12, 2014 23:50 IST2014-06-12T23:50:03+5:302014-06-12T23:50:03+5:30
हवामान खात्याच्या अंदजानुसार यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा दावा केल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

मान्सून लांबल्याने बळीराजा चिंतातूर
बियाणे महाग : स्वतंत्र सिंचन व्यवस्था असणारे सुद्धा धास्तावले
पालांदूर : हवामान खात्याच्या अंदजानुसार यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा दावा केल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण ६८ टक्केच्या वर आहे. निसर्गावर शेती पूर्णपणे अवलंबून असल्याने पाणी महत्वाचा विषय आहे. रोहिणी संपूर्ण कोरडाच गेला तर मृग अर्ध्यावर येऊनही पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्हे टाकायचे कसे, धानाचे वाण महाग असल्याने दुबार पेरणीची वेळ येऊ नये याकरिता पुरेपुर विचार करूनच पेरणी करण्याचा मनसुबा व्यक्त होत आहे.
कृषीकेंद्रात बियाणे फारच महाग झाले आहेत. साठ रुपये दर प्रति क्विंटल पासून बियाणे विक्रीला असून एका एकराला वीस कि. बारीक बियाणे गरजेचे आहेत. दहा कि. वजनाची धानाची पिशवी विक्रीकरिता सज्ज आहे. लहान पिशवीमुळेही भाव तेजीत आहेत.
महागाईने वर डोके काढल्याने बळीराजा तोंडावर हात ठेऊनच बियाणे खरेदी करताना दिसतो.खरच मान्सून उशिरा आला तर नक्कीच तापमानात फरक पडणार हे निश्चित. दरवर्षीच्या अंदाजानुसार शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून म्हणा किंवा खोवाळ म्हणा परंतु तापमान कमी होऊन वातावरणात थंडावा वाढत होता. मात्र हल्ली पावसाचा थेंबसुद्धा पालांदूर परिसरात पडला नाही. यामुळे तापमान ४७ अंशावर गेल्याने स्वतंत्र सिंचन व्यवस्था असणारे सुद्धा धास्तावल्याने पऱ्हे टाकलेच नाही. (वार्ताहर)