पाण्याअभावी पऱ्हे करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:53+5:302021-07-08T04:23:53+5:30
०७ लोक ०५ के विशाल रणदिवे अडयाळ : अडयाळ व परिसरातील तब्बल ८० लहान-मोठ्या गावांतील शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे ...

पाण्याअभावी पऱ्हे करपले
०७ लोक ०५ के
विशाल रणदिवे
अडयाळ :
अडयाळ व परिसरातील तब्बल ८० लहान-मोठ्या गावांतील शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे चिंताग्रस्त आहेत. पावसाचा थांगपत्ता नसल्याने पऱ्हे करपत आहेत. आधीच नेरला उपसा सिंचन व निसर्गाची साथ लाभली नाही तर पर्यायाने शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
अडयाळ आणि परिसरात आजही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. दुसरी खेदाची बाब म्हणजे जोपर्यंत शेतकरी पाणीपट्टी भरणार नाहीत तो पावेतो नेरला उपसा सिंचन सुरू होणार नसल्याने येथील शेतकरी डोक्यावर हात ठेवूनच आहे. नेरला उपसा सिंचन सुरू करावे म्हणून अडयाळ येथील पवणी तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष अमोल उराडे यांनी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन दिले आहे. तसेच अडयाळ, चिखली, पिलांद्री, उमरी, केसलवाडा, सालेवाडा इत्यादी गावांतील शेतकरी मोठ्या आतुरतेने नेरला उपसा सिंचन सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत.
उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथून जी पत्रके वाटप झालीत, त्या मानाने गावागावातच जर पाणीपट्टी जमा करणारा एक अधिकारी वा कर्मचारी दिले असते तर काम सोपे झाले असते. प्रत्येक शेतकरी हा आंबाडी येथील कार्यालयात जाऊन पाणी पट्टी जमा करायला जाणार कसा, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षांची पाणीपट्टी भरणे आहे. नेरला उपसा सिंचन योजनेची बरीच कामे पूर्ण झालीच नाहीत, तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं?, यावेळी ही चर्चा मात्र अनेक गावात रंगत आहे. आज शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे आणि अशाही परिस्थितीत बोलायचे नाही काल असा प्रतिप्रश्न शेतकरी विचारीत आहेत. येत्या पाच दिवसांत पाणी बरसला नाही आणि नेरला उपसा सिंचनाचे पाणीही जर सोडले गेले नाही तर मग शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही आणि असे होणे म्हणजे पुन्हा आर्थिक संकटात सापडणे, असा आहे.