दुष्काळी मदत पोहोचलीच नाही
By Admin | Updated: May 3, 2016 00:39 IST2016-05-03T00:39:03+5:302016-05-03T00:39:03+5:30
दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली;

दुष्काळी मदत पोहोचलीच नाही
पावसाळा तोंडावर : बळीराजा हवालदिल
देवानंद नंदेश्वर भंडारा
दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अद्याप मदत निधी उपलब्ध झाला नाही. पावसाळा तोंडावर आला असला तरी दुष्काळी मदतीचा पत्ता नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ३७१ गावातील शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीमुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीनुसार ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील गावांमध्ये गत २३ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ३७१ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील ३७१ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत निधी अद्याप उपलब्ध झाला नाही.
हवामान वेधशाळांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे. त्यानुसार पावसाळा महिनाभरावर आला असून, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी, शासनाकडून दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिकांचे उत्पादन बुडाले. नापिकीमुळे जवळ पैसा नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून, येत्या खरीप हंगामात पीक पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यानुषंगाने खरीप पेरणीपूर्वी शासनाकडून दुष्काळी मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे; परंतु पावसाळा महिनाभरावर आला असताना, शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याच्या स्थितीत खरीप पेरणीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.