जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा : ४० लाखांचा मिळाला निधी, स्वच्छता अभियानातही मारली बाजी
भंडारा : तालुक्यातील बेला या गावाने जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पहिल्यांदाच घोषित झालेल्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम योजनेत बेला ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. यात महाराष्ट्र दिनी झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या हस्ते बेला ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यानी हा पुरस्कार स्वीकारला.४० लक्ष रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विशेष म्हणजे स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कारही बेला या गावाने पटकाविला आहे. यात १० लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. या आशयाची माहिती सरपंच शारदा गायधने यांनी मंगळवारी बेला ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी उपसरपंच अर्चना कांबळे, ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपूरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी उपस्थित होते. सरपंच गायधने यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवर पहिल्यांदाच बेला ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम योजनेत सहभाग नोंदविला होता. जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींची स्मार्ट ग्राम योजना जिल्हास्तरीय तपासणी चमूने पाहणी केली असता त्यामध्ये भंडारा तालुक्यातील बेला ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक आला. या शिवाय बेला ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. कॅशलेस व्यवहार, शोष खड््यांचे बांधकाम, बायोमॅट्रीक मशीन, १ ते ३३ प्रकारचे नमुने, चावडीचे बांधकाम, शंभरटक्के कर वसुली, एलईडी पथदिवे, ग्रामपंचायतीचे सौंदर्यीकरण, रेनवॉटर हार्वेस्टींग, कम्पोस्ट खत प्रकल्प, पाणीपुरवठा योजनेंअतर्गत शुध्द पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र वेबसाईट आदी नाविण्यपुर्ण उपक्रमही राबविण्यात आल्याची माहितीही सरपंच गायधने यांनी दिली. याशिवाय संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत प्रथम पुरस्कार संयुक्तरित्या मिळाला आहे. बेला ग्रामपंचायतीने एकूण पाच पुरस्कार प्राप्त केले आहे. या यशामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय गाढवे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर, विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे, भिमगिरी बोदेले, सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कन्हैया नागपूरे, पोलीस पाटील श्रीराम भिवगडे, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.महाराष्ट्रदिनी आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. सावंत, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार स्विकारतांना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शारदा गायधने व उपसरपंच अर्चना कांबळे, ग्राम विकास अधिकारी नागपूरे, ग्रा.प. सदस्य रजनी बाभरे, हीरा ताई निंबार्ते, कुंदा शेंडे, अनिता खवस, कविता इमले, धनराज घरडे, रमेश लुटे, पराग वघरे, गणेश ठवकर, भुपेंद्र रामटेके, गोपीचंद गाढवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)