पोलीस प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना
By Admin | Updated: November 19, 2016 00:36 IST2016-11-19T00:36:11+5:302016-11-19T00:36:11+5:30
सुमारे २० वर्षापुर्वी महसूल विभागाकडून नाममात्र एक रूपया भाडे तत्वावर पोलीस विभागाला जागा सुपूर्द करण्यात आली.

पोलीस प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांची अवहेलना
पंतप्रधानांना केली तक्रार : चैतन्य पोलीस मैदानावर फिरण्यासाठी फी चा तगादा
भंडारा : सुमारे २० वर्षापुर्वी महसूल विभागाकडून नाममात्र एक रूपया भाडे तत्वावर पोलीस विभागाला जागा सुपूर्द करण्यात आली. मात्र या मैदानावर फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अन्य व्यक्तींकडून फिरायसाठी पैसे द्यावे, असा तगादा लावण्यात येत असून प्रशासनाने गणेशपूर मार्गावरील गेटला कुलूप लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद मोदी यांना केली आहे.
महसूल विभागाच्या अखत्यारीतील मोकळी जागा सुमारे २० वर्षापुर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती. या जागेचे नाममात्र एक रूपया भाडे वसूल करण्यात येते. या मैदानाचा वापर पोलीस प्रशासनाकडून खेळाचे मैदान, कवायती मैदान, पोलीस भरती व अन्य कामांसाठी केला जातो. त्या जागेवरील काही भागात पोलीस प्रशासनाने चैतन्य पोलीस मैदान तयार केले. सुमारे दोन हजार स्वे. फूट जागेवर इमारत बांधून तिथे जीम तयार करण्यात आले आहे. तेव्हापासून परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकही सकाळ व सायंकाळी फिरायला जातात. दरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून ३० रूपये व अन्य नागरिकांकडून ५० रूपये मासिक वर्गणी घेणे सुरू केले. याला नागरिकांनी विरोध केला होता. मात्र प्रशासनापुढे नागरिकांचे चालले नाही. १ नोव्हेंबरपासून पोलीस प्रशासनाने चैतन्य कवायत मैदानावर सकाळ व सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्व व्यक्तींकडून अवाढव्य फी आकारण्याचा बोर्ड प्रवेश द्वारासह मैदानाच्या चारही बाजुला लावला. यात मासिक वर्गणी म्हणून ६० वर्षावरील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांकडून १०० रूपये, ६० वर्षावरील इतर खाजगी व्यक्तीकडून ५० रूपये तर ६० वर्षाखालील सर्व व्यक्तींकडून २०० रूपये आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मासिक वर्गणी न देणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबीही या नोटीस बोर्डवर प्रशासनाने लावल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे. पोलीस प्रशासनाने एवढ्यावरच न थांबता गणेशपूरकडून जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवेश द्वाराला कुलूप लावून मार्ग बंद केल्याचा आरोपही आहे.
केवळ नाममात्र एक रूपया भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनीवर फिरण्याकरीता जाणाऱ्या व्यक्तींची पैशाच्या माध्यमातून लुबाडणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पोलीस प्रशासनास योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे व फी बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये एस.के. गाढवे, एच.एन. गजभिये, ए.टी. चवरे, के.एम. मदारकर, टी.बी. निपाने, जी.एस. महाकाळकर, डब्ल्यु. एम. चकोले, श्रीराम सोनकुसरे, एन.के. मेहर, डॉ. महेंद्र गणवीर यांच्यासह अन्य नागरिकांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)