महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष

By Admin | Updated: September 9, 2016 01:27 IST2016-09-09T01:27:45+5:302016-09-09T01:27:45+5:30

येथील महावितरण कार्यालयावर १५० शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत खंडीत विजेमुळे संताप व्यक्त होत आहे.

Discontent among farmers against MSEDCL | महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष

महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये असंतोष

पाच कृषी फिडर बंद : खराशी पुलाच्या बांधकामाने कोसळला खांब, शेकडो शेतकरी अडचणीत
पालांदूर : येथील महावितरण कार्यालयावर १५० शेतकऱ्यांनी हल्लाबोल करीत खंडीत विजेमुळे संताप व्यक्त होत आहे. मागील दहा दिवसांपासून खराशी पुलाच्या बांधकामामुळे खांब कोसळला. यामुळे परिसरातील कृषी फिडर पूर्णत: बंद झाल्याने सिंचन रखडले आहे.
धानपीक गर्भावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज असताना निसर्गाने दगा दिला. महावितरणने पुढाकार न घेतल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. विद्युत खांब जमीनदोस्त होऊ शकतो, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते डमदेव कहालकर यांनी महावितरणला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने खांब कोसळला. यात बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकारी एकमेकांना सावरत बाजू सांभाळत आहेत. यात मात्र शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. महावितरणची कामे कंत्राटी पद्धतीने होतात. यात मुख्य कंत्राटदार त्यांचे उपकंत्राट दुसऱ्यांना देतात. याकडे मुख्य कंत्राटदार पाहत नसल्याने कामाचा बोजवारा वाजतो.
यासंदर्भात शेतकऱ्यंनी महावितरण विभागाला दिलेल्या निवेदनानुसार, आम्हाला अचुक बिल व नियमित द्या, आम्ही नक्की भरू. पण महावितरण आरएनएच्या नावाखाली अव्वाच्यासव्वा बिल पाठवून शेतकऱ्यांना वेठीस धरतात. शेतकऱ्यांचे बिल त्यांच्या घरी देत नसल्याचा आरोप कहालकर यांनी केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी आपुलकी नसल्याने खंडीत वीज वेळीच सुरळीत होत नाही. कारखान्यांना दिवसाला १२ तास वीज मिळते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा सवालही शेतकऱ्यांनी केला. मुख्यमंत्री व उर्जामंत्र्यांनी दिवसाला १२ तास वीज देण्याचे मान्य केले. मात्र प्रत्यक्षात ७-८ तासाच्या वर वीज मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)

खराशी नाल्यावरील वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद आहे. पूर्ववत करण्याकरिता कंत्राटदाराशी बोलणी सुरु आहे. माणसे मिळत नसल्याचे कारण कंत्राटदार सांगत आहे. काम सुरु केल्यास २-३ दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला जाईल.
- पंकज आखाडे, सहाय्यक अभियंता, पालांदूर चौ.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्युत खांब पडला. घटना रात्रीला घडल्याने काही अनुचित घडले नाही. अन्यथा जीवीतहानी झाली असती. पुलाची उंची व खांबाची उंची हे अंतर कमी आहे. खांब पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्याला विद्युत व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.
- तुकाराम भुसारी, शेतकरी, पालांदूर चौ.

Web Title: Discontent among farmers against MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.