'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 17:35 IST2021-12-19T16:25:59+5:302021-12-19T17:35:11+5:30
सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार'
भंडारा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. हे सरकार सामान्य माणसाचं नसून दारू विकणाऱ्यांचे असल्याचा घाणाघात त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस सध्या भंडारा दौऱ्यावर असून, लाखनी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सभेत सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार सामान्य माणसांचं सरकार नाही, लोकांसाठी काम करणारं सरकार हरवल आहे. कोरोना काळात या सरकारने सामान्य नागरिकांना जराही मदत केली नाही. परंतु, बार मालक शरद पवारांकडे मदतीसाठी गेले तेव्हा त्यांनी परवाना शुल्क कमी केले. विदेशी दारुवर ५० टक्के कर माफ करण्याचा निर्णय घेतला. हे गरिबांचे नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला.
ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. त्यांनी वेळीच इम्पिरिकल डेटा जमा केला असता तर आज ही वेळ आली नसती. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असेही फडणवीस म्हणाले.
यासोबत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरही निशाणा साधला, पटोले रोज संविधान खतरे में हैं म्हणतात, पण धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना मात्र ते बोलत नाही. आम्ही ५ वर्षाच्या काळात एकदाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र, हे सरकार रोज शेतकऱ्यांची वीज कापत असल्याचेही ते म्हणाले.