साकोली तालुक्याचा विकास रखडला
By Admin | Updated: June 14, 2014 23:23 IST2014-06-14T23:23:52+5:302014-06-14T23:23:52+5:30
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, विकासाप्रती उदासीन असलेल्या नोकरशाहीमुळे साकोली तालुक्याचा विकास रखडला असून अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा मिळत

साकोली तालुक्याचा विकास रखडला
साकोली : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, विकासाप्रती उदासीन असलेल्या नोकरशाहीमुळे साकोली तालुक्याचा विकास रखडला असून अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप किसान गर्जनाचे जिल्हा महामंत्री रामरतन चांदेवार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.
कृषी विभागाच्या योजना, पंचायत समितीतील योजना, तहसीलमधील योजना, साकोली तालुक्यात खऱ्या गरजू, नागरिकांपर्यंत पोहचण्यात दिरंगाई होत आहे. विविध योजना सरकार नागरिकांकरिता राबविते. परंतु अडेलतट्टू अधिकाऱ्यांमुळे त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. अपुऱ्या निधीअभावी बऱ्याच विकासाच्या योजना जिल्ह्यामध्ये राबविता येत नाही. बेरोजगारांच्या विकासासाठी असलेल्या योजना तालुक्यात फारच कमी प्रमाणात राबविल्या जात असल्यामुळे बेरोजगार युवक स्वत:च्या पायावर उभा होऊ शकला नाही. बेरोजगारांच्या विविध योजनांची अंमलबजावणी न झाल्याने तालुक्यातील युवक बेरोजगार परजिल्ह्यात, राज्यात कामधंद्याकरीता भटकत आहेत. त्यांना शासकीय योजनांचा लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे काहीच प्रयत्न दिसून येत नाही. शासकीय योजनेतून कर्ज मिळविण्याकरिता त्यांना वणवण फिरावे लागत आहे. यात बँकांची उदासीनता दिसून येते.साकोली तालुक्यात शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेबद्दल माहिती नाही. पं.स. साकोली अंतर्गत इतर तालुक्याच्या तुलनेत विकासाच्या योजना फार कमी लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. साकोली तहसीलमार्फत राशनकार्ड प्रकरणी गरीबांना हक्काचे राशनकार्ड मिळविण्याकरीता पायपीट करावे लागते. अनेक गरीब, गरजू कुटुंबाजवळ राशनकार्ड नाहीत. अन्नधान्य, केरोसीन यांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप रामरतन चांदेवार यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)