जलसंपत्ती असूनही सिंचनासाठी आसुसलेला
By Admin | Updated: April 25, 2015 00:48 IST2015-04-25T00:48:48+5:302015-04-25T00:48:48+5:30
भंडारा जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात १७४८ मामा तलाव अस्तित्वात होते.

जलसंपत्ती असूनही सिंचनासाठी आसुसलेला
१४२१ माजी मालगुजारी तलाव : दुरूस्तीअभावी पाण्याचा वापर मर्यादित
गोंदिया : भंडारा जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात १७४८ मामा तलाव अस्तित्वात होते. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने मात्र प्रत्यक्षात किती मामा तलाव जिल्ह्यात आले याची माहिती घेतली. त्यात १४२१ मामा तलाव प्रत्यक्षात असल्याची महिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येत एखाद्या जिल्ह्यात मामा तलाव असणे साधारण बाब नसून यामुळेच १४२१ मामा तलाव असलेला गोंदिया हा ‘धनी’ जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलाव असले तरी योग्य त्या देखभाल दुरूस्तीअभावी यातील काही तलावांना अखेरची घरघर लागली आहे.
मानवाला त्याच्या दैनंदिन उपयोगाशिवाय शेतीसाठी या मामा तलावांचा उपयोग होतो. विशेष म्हणजे भूगर्भातील जलस्तर वाढविण्यासाठी या मामा तलावांची उपयोगीता असून जल संपत्तीचे संग्रहण करण्याचे हे एक महत्वपूर्ण साधन आहे.
मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी उपाययोजना
आज मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी एमआरईजीएस अंतर्गत गाळ काढण्यासारखे काम केले जात आहेत. मात्र पाहिजे त्या प्रमाणात ही कामे होत नसल्याचीही वास्तवीकता आहे.
याकरिता विभागाने शासनाकडे तलावांच्या दुरूस्तीसाठी विशेष निधीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मामा तलावांचा हा मुद्दा लक्षात घेत शासनाने मधूकर किंमतकर यांच्या अध्यक्षतेत दोन-तीन वर्षांपूर्वी समिती गठीत केली होती. समितीने विदर्भातील मामा तलावांचा सखोल अभ्यास करून सुमारे शिफारसी शासनाकडे केल्या आहेत. याशिवाय जल संपत्ती वाढविण्यासाठी शासनाचे जलयुक्त शिवार अभियान प्रभावी ठरणार आहे.
सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी भविष्यातील पाणी टंचाईचे आकलन करून मामा तलाव तयार केले.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच गोंदिया व भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. पूर्वजांच्या पुण्याचे फलीत आजच्या पिढीला चाखायला मिळत असून त्यांच्या पुण्याईनेच जिल्ह्यात पाणी टंचाई होत नाही.
मात्र आजच्या पिढीला या जल संपत्तीचा अपव्यय टाळून जास्तीत जास्त सिंचन करण्याची गरज आहे. असे न झाल्यास येणारी पिढी मात्र पाण्यासाठी तडपणार यात शंका नाही. जल संपत्ती हीच खरी संपत्ती असून या संपत्तीचे वेळीच जतन करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
मामा तलावांचा इतिहास
गोंड राजाचे राज्य असल्यामुळेच जिल्ह्याला गोंदिया हे नाव पडले. सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वी गोंडराजांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सुमारे ३५०० तलाव तयार केले होते. भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचे आकलन करून यासाठी त्यांनी तेव्हा स्पर्धा घेतली होती. स्पर्धेत तेव्हाच्या पवार व कोहळी जातीतील मालगुजारांनी तेव्हाचे तांत्रीक ज्ञान वापरून या तलावांची निर्मिती केली होती. यामुळेच या तलावांना आज ‘माजी मालगुजारी तलाव’ (मामा तलाव) म्हणून संबोधले जाते. पुढे सन १९६० मध्ये शासनाने हे सर्व तलाव देखभाल व दुरूस्तीसाठी आपल्या ताब्यात घेतले. या तलावांतून पाणी वापरणाऱ्यांकडून शासन कर घेऊन लागले. याविरोधात मात्र हे तलाव तयार करणारे मालगुजार न्यायालयात गेले. त्यांची बाजू ऐकत न्यायालयाने सन १९६१ मध्ये या मालगुजारांना नि:शुल्क पाणी वापरता येणार असल्याचा निकाल (निस्तार हक्क) सुनावला.
मामा तलावांची आजची स्थिती
लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात १४२१ मामा तलाव आहेत. मात्र देखभाल व दुरूस्ती अभावी यातील ३५२ तलावांची स्थिती गंभीर आहे. ३५२ बद्दल बोलले जात असले तरिही बहुतांश मामा तलाव आपल्या दैनावस्थेवर रडत असल्याचे चित्र बघावयास मिळते. लघु पाटबंधारे विभागानुसार जिल्ह्यातील मामा तलावांची सिंचन क्षमता २८ हजार हेक्टर असली पाहिजे. मात्र त्यांची सिंचन क्षमता १८ हजार हेक्टर आहे. यातूनच या मामा तलावांना देखभाल दुरूस्तीची गरज असल्याचे दिसून येते. विभागाकडून ३५२ तलावांना पाळ, सांडवा व गाळ उपसण्याची गरज असल्याचे सांगीतले जात असले तरी बहुतांश तलावांत ही समस्या आहे. विशेष म्हणजे यातही तलावांतील गाळ काढण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण या तलावांत गाळ साचल्यामुळेच तलावांची सिंचन क्षमता घसरत चालली आहे. विभागाच्या सप्रयोजन देखभाल दुरूस्तीअंतर्गत तलावांची देखभाल दुरूस्ती केली जाते. मात्र पर्याप्त मात्रेत निधी मिळत नसल्यामुळे एमआरईजीएस च्या माध्यमातून ग्राम पंचायतमार्फत काम करविले जात आहेत.