‘गोसेखुर्द’ असूनही दुष्काळी स्थितीत
By Admin | Updated: December 8, 2015 00:40 IST2015-12-08T00:40:59+5:302015-12-08T00:40:59+5:30
विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण ज्या गोसेखुर्द गावाजवळ तयार झाले आहे.

‘गोसेखुर्द’ असूनही दुष्काळी स्थितीत
उपयोग तरी काय? : सिंचनाच्या प्रश्नाकडे अजूनही कानाडोळा
पवनी : विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण ज्या गोसेखुर्द गावाजवळ तयार झाले आहे. ते गाव व परिसरातील गावे धरणातील पाण्याच्या सिंचनापासून वंचित आहेत. या गावातील शेतकरी मागील तीन वर्षापासून दुष्काळाने हवालदिल झाला आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे धानाची रोवणी झालेली नाही.
गोसेखुर्द गाव परिसरातील गोसे बुज, मेंढा, वासेळा, कुर्झा आदी गावातील शेतीला धरणाचे पाणी मिळत नसल्यामुळे सिंचनापासून वंचीत झाली आहे. मागीलवर्षी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गोसेखुर्द धरणाला भेट देण्यासाठी आले असता वंचित राहणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी ना.महाजन यांना मागण्यांचे निवेदन देऊन गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतीला देण्याकरीता चर्चा केली. त्यावेळी ना.महाजन यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कार्यवाही न झाल्यामुळे शेतकरी दुष्काळाशी सामना करीत आहेत.
चार पाच वर्षापासून गोसेखुर्द धरणात जलसाठा करण्यात येत आहे. या धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीला सिंचनासाठी सोडले जात आहे. पण या धरणाचे पाणी परिसरातील गावातील शेतीला दिले जात नाहीे. मागील तीन वर्षापासून या परिसरात दुष्काळ पडत आहे. यावर्षीही या परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी करता आली नाही. येथील शेती ही नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. पण येथे सिंचनाची काहीही सोय नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी या परिसरात दुष्काळाची स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. येथील शेतकरी कर्जात बुडाले आहेत.
गोसेखुर्द धरण तयार करण्याकरीता या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने सरकारला दिली. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे स्वप्न साकार होऊ शकले. या शेतकऱ्यांनी सरकारला मदत केली. पण या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेजच्या कोणताही लाभ होऊ शकला नाही. गोसेखुर्द धरण पाण्याने तुडुंब भरले आहे. या पाण्याचा या परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा न होणे हे शेतकऱ्यांसाठी दुर्देवी ठरत आहे.
या परिसरातील शेतीला धरणाचे पाणी सिंचनासाठी देण्यात येण्याकरिता कोणतेही नियोजन तयार करण्यात आलेले नाही. या शेतकऱ्यांनी गोसेखुर्द धरणाचे पाणी त्यांच्या शेतीला सिंचनाकरिता द्यावे याकरिता अनेक निवेदन सरकारला दिले. पण काहीही उपयोग झाला नाही.