लाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भारनियमनाने वैतागलेल्या करडी परिसरातील शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी तुमसर -साकोली राज्यमार्गावरील वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज येताच महावितरण कंपनीने चांगलाच धसका घेतला. आंदोलनाच्या २४ तासापूर्वीच करडी ठाण्यात आंदोलकांना बोलावून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.करडी व मुंढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कृषी पंपांना १० ते १२ तासाचा वीज पुरवठा करण्यात यावा, रात्रीऐवजी दिवसा पुरवठा करण्यात यावा, बंद मीटर काढून नवीन मीटर बसविण्यात यावे, या तीन मागण्यांसाठी करडी वीज वितरण कार्यालयासमोर रास्ता रोको व मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे पदाधिकारी तथा मुंढरी खुर्दचे सरपंच रामप्रसाद नेरकर, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे व मोहाडी तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनिल सार्वे करणार होते. तसे निवेदनही नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालकांना देण्यात आले होते. आंदोलनाची जय्यत तयारी परिसरातील २५ गावात सुरू होती. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याचा अंदाज येताच प्रशासन पुरते हादरले.अखेर १७ एप्रिल रोजी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना करडी ठाण्यात चर्चेसाठी बोलविण्यात आले. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संजय भुते व शेतकऱ्यांत सविस्तर चर्चा झाली. आठ तास नियमित वीज व अन्य मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने अखेर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, सरपंच रामप्रसाद नेरकर, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल सार्वे व शेतकरी उपस्थित होते.