बावनथडी प्रकल्प : राजापूर वितरिकेचे काम अद्यापही थंडबस्त्याततुमसर : तुमसर तालुक्यात साकारण्यात आलेल्या आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पावर जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी केली आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असताना या प्रकल्पावर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाली आहे. असे असले वायू पाणी व जमिनीचे प्रदूषण होणार असून पर्यावरणाच्या समस्याही उद्भवणार असल्याने भविष्यातील संकट लक्षात घेता औष्णिक विद्युत ऐवजी जलविद्युत निर्मिती केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात शासनाच्या प्रतिनिधीकडे निवेदन पाठविली. जलविद्युत केंद्रामुळे या भागातील ग्राहकांना नियमित वीज पुरवठा होणार असून नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना भारनियमनाची समस्या भेडसावणार नाही. त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्यातही वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. राजापूर वितरिकेचे काम अजूनही थंडबस्त्यातच असल्याने लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, राजापूर, सुंदरटोला, सितासावंगी, खंदाळ, गुढरी आदी गावातील शेतकरी बावनथडी प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. जेवढेही कार्य राजापूर वितरीकेचे करण्यात आले त्यात आलेसूर, चिखली, देवनारा, कुरमुडा, डोंगरी बु., लोभी या गावांचा समावेश आहे. या गावांपर्यंत नहराचे खोदकाम झाले असून त्यातही मोठमोठे भगदाड पडल्याने राजापूर वितरिका पूर्णत: निकामी ठरली. परिणामी परिसरातील शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना मोबदलाही अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाच्या लोकप्रतिनिधीने आवाज उठवून प्रत्यक्षात शासनाच्या नजरेत आणून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचीही मागणी आष्टी जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित सदस्या संगीता मुंगुसमारे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
जलविद्युत निर्मिती केंद्राची मागणी
By admin | Updated: July 20, 2015 00:36 IST