पवनी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST2021-01-02T04:29:01+5:302021-01-02T04:29:01+5:30
यावर्षी धानाचा उतारा अतिशय कमी प्रमाणात आहे. धानावर अनेक जातीच्या किडयांनी मारा केल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प धानाचे पीक झाले. ...

पवनी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
यावर्षी धानाचा उतारा अतिशय कमी प्रमाणात आहे. धानावर अनेक जातीच्या किडयांनी मारा केल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प धानाचे पीक झाले. तसेच अवकाळी पाऊस दोन - तीनदा आल्याने यावेळी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अनेकांना धानाचे पीक शेती जेवढी तेवढे पोते धान झाले, त्यामुळे खर्च निघणे मुश्किल झाल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. या बिकट अवस्थेमुळे अनेक शेतकरी यावर्षी बँका, सहकारी संस्था यांचे कर्ज फेडू शकत नाहीत. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवनी तालुक्यातील ८९ गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. ५२ गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा अधिक प्रमाणात आहे. तेव्हा ८९ गावे दुष्काळाच्या छायेत असल्याने संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करणे आवश्यक आहे. कमी आणेवारी असलेल्या गावात अनेक सवलती मिळत असतात. ज्यात जमीन महसूल यात सूट, शेतकरी पाल्यांना परीक्षा शुल्क माफ, नरेगा कामे प्राधान्याने करणे, शेतकरी लोकांना अनेक सवलती दिल्या जातात. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण पवनी तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.