वंचितांच्या कल्याणासाठी कटीबद्ध

By Admin | Updated: September 21, 2016 00:30 IST2016-09-21T00:30:11+5:302016-09-21T00:30:11+5:30

भटक्या विमुक्त तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असून ...

Dedicated to the welfare of the welfare | वंचितांच्या कल्याणासाठी कटीबद्ध

वंचितांच्या कल्याणासाठी कटीबद्ध

राजकुमार बडोले : विमुक्त भटक्या जमातीला जात प्रमाणपत्राचे वाटप
भंडारा : भटक्या विमुक्त तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या असून या योजनांच्या माध्यमातून वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
महाराजस्व अभियानांतर्गत मांग गारुडी, गोपाळ, वडार व इतर अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना.बडोले बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देवसूधन धारगावे, तहसीलदार संजय पवार, भटक्या विमुक्त समाज परिषदेचे शिवा कांबळे, अंकुश तांदूयकर, उकंड वडस्कर व दिलीप चित्रीव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपल्या विकासास चालना द्यावी, समाजाची परिस्थिती जर सुधारावयाची असेल शिक्षण घेणे महत्वाचे आहे. या समाजाने शिक्षणास प्राधान्य देवून आपले जीवन सुकर करावे, असे ते म्हणाले, भटक्या विमुक्तांना समाजाने आपले म्हणावे, असे आवाहन करून बडोले म्हणाले की, सर्वांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मांग गारुडी समाजाला अनुसूचित जातीच्या योजनांचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात जागा मिळण्यासाठी व मांग गारुडी समाजाला स्वत:ची वसाहत मिळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. शासनाच्या विविध योजना व विकासात भटक्या विमुक्तांना अग्रक्रम तसेच प्राधान्य देण्यात यावे, असे ते म्हणाले. जात प्रमाणपत्र मिळालेल्यांमध्ये विद्यार्थी असल्यास त्यांनी शिक्षण घ्यावे व समाजाला पुढे न्यावे, असे ते म्हणाले. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या समाजातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी पुढाकार घेता जाईल, असे आश्वासन बडोले यांनी दिले.
बडोले पुढे म्हणाले, आज जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यांनी नाराज व्हायचे कारण नाही. प्रमाणपत्राबाबत शासकीय स्तरावर काही त्रुटी असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी व ग्रामस्तरावर बैठक घेवून तोडगा काढण्यात येईल. लवकरच त्यांनाही दाखले देण्यात येतील असेही ते म्हणाले. या समाजाने शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यावे तरच समाजाचा उद्धार होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी तर संचालन तहसीलदार संजय पवार यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Dedicated to the welfare of the welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.